नाशिक - 'पंधरा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर राहिल्यामुळे कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्या डोक्यात हवा गेली होती. त्याचा परिणाम 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. आमचा पराभव मोदी लाटेमुळे नव्हे तर सत्तेतील नेत्यांच्या मस्तीमुळेच झाला,' अशी कबुली प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज दिली.
आगामी लोकसभा व राज्यातील विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी व युवक कॉंग्रेसतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांच्या नियोजनासाठी युवक कॉंग्रेसची बैठक आज कॉंग्रेस भवनात झाली. त्या वेळी तांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील संभाव्य शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पंचायतराज अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. याद्वारे "गाव तेथे कॉंग्रेसची शाखा' हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून मोठा पक्षनिधी मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाइन डोनेशनही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
सुजय विखेंनी कॉंग्रेसमध्ये राहावे
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी पुढील लोकसभेत खासदारकी मिळविण्यासाठी कॉंग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची तयारी सुरू केल्याबद्धल हा दबावतंत्राचा भाग आहे का? असा प्रश्न विचारला असता तांबे यांनी डॉ. सुजय वेगळा विचार करणार नाहीत, कारण त्यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय असल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यांच्या दक्षिण नगरमधील संभाव्य उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, त्यामुळे त्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्लाही तांबे यांनी दिला.
|