वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील तिसगांव धरणाच्या मृत पाणीसाठ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या पंधरा गायी धरणातील गाळात अडकून पडल्याची घटना काल (ता. 21) दुपारी घडली असून गाळात अडकलेल्या गायींची ट्रॅक्टरला सहाय्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सुटका केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी तीसंगाव, कंरजवण, पूणेगाव, वाघाड धरण कोरडे ठाक झाले असून धरणातील मृतसाठाही दिवसागणिक कमी होत असल्याने जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहेच. मात्र पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. आज तिसगांव धरण परीसरातील काठेवाडी दुग्धव्यवसायीक लक्ष्मण गवळी हे त्यांच्या 60 गाई धरण परीसरात घेवून गेले होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास गायींना पाणी पाजण्यासाठी नेहमीप्रमाणे तिसगाव धरणातील थोडा फार राहीलेला पाण्याच्या मृतसाठ्यातील पाण्याच्या डबक्याजवळ गेल्या असता, पाणी कमी झाल्यामुळे तेथे निर्माण झालेल्या गाळात अडकल्या. याबातची माहिती गायीमालक गवळी यांनी परीसरातील परिचयातील शेतकऱ्यांना व स्थानिकांना दिल्यानंतर सोनजांब येथील शेतकरी योगेश बाळासाहेब जाधव यांनी स्वतःचे ट्रॅक्टर आणून एकएका गायीला दोरखंडाने बांधून व ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळात फसलेल्या गायींना बाहेर काढले. यावेळी कैलास जाधव, विश्वनाथ जाधव, रावसाहेब जाधव, जाधव, प्रविण जाधव, सिताराम धोत्रे आदींसह खेडगाव, सोनजांब येथील नागरिकांनी मदत करीत 15 गायींची सुखरुप सुटका करीत प्राण वाचवले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.