तांदूळ जप्त अन्‌ विद्यार्थी उपाशी!

जळगाव - पोलिसांनी ताब्यात घेतलेले धान्याचे वाहन.
जळगाव - पोलिसांनी ताब्यात घेतलेले धान्याचे वाहन.

जळगाव - शाळेत पाणी व स्वयंपाक करण्याची व्यवस्था नसल्याने शाळेतून माध्यान्ह भोजन योजनेतील धान्य बचत गटाकडे नेणारी मालवाहू रिक्षा व त्यातील पंधरा क्विंटल तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेतला. शाळा व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

असोदा रस्त्यावरील गुलाब महिला बचतगटाला आर. आर. शाळेतील एक हजार ८०० विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचा ठेका देण्यात आला आहे. या बचत गटाकडे इतरही शाळांचा पोषण आहार तयार करण्याचा ठेका असून, आर. आर. शाळेत स्वयंपाकासाठी पाणी व अन्य सुविधा नसल्याने पंधरा दिवसांचे धान्य गुलाब बचत गटाच्या महिला घेऊन जातात व भोजन तयार करून दररोज दोन वेळेस पोषण आहार शाळेत आणून दिला जातो. 

तक्रारीवरून कारवाई
बचतगटातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाला शंभर किलो तांदळातून पोषण आहार तयार केला जातो. शाळेत स्वयंपाकाची व्यवस्था नाही म्हणून आम्ही दर पंधरा दिवसांचे तीस पोते तांदूळ नेतो व भोजन तयार करून आणतो. मात्र, तांदूळ घेऊन जात असतानाच पोलिसांनी वाहन पकडल्याने मुलांना आज दुपारचे भोजन देता येणार नाही. विजय लाठी यांनी काही मिनिटापूर्वीच आमची अडवणूक करून पोलिसांना फोन लावल्याचे या महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.    

अज्ञात व्यक्तीच्या माहितीवरून कारवाई
अज्ञात व्यक्तीने पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकातील राजेंद्र मेंढे, नाना तायडे, किशोर पाटील आदींनी कारवाई केली. त्याआधीच घटनास्थळावर एक खासगी कॅमेरामन सर्व घटनाक्रम चित्रित करीत होता.

पोलिसांत तक्रार व कारवाई
आज सकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्यावर धान्यसाठा नेण्यात येणार होता. त्यासाठी बचतगटातील सदस्य शाळेत धान्य घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र, मालवाहू रिक्षात धान्याचे पोते टाकताच पोलिस गाडी शाळेत पोचली. धान्यासह ऑटोरिक्षा ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मागोमाग बचत गटातील सदस्य महिला आणि पोषण आहाराची जबाबदारी असलेले शिक्षक गिरीश रमणलाल भावसार यांनाही पोलिस ठाण्यात चौकशीला बोलावण्यात आले होते. 

व्यवस्थापन- कर्मचारी वादाची पार्श्‍वभूमी
दोन वर्षांपूर्वी ‘आर. आर.’च्या मुख्याध्यापकांसह ६७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्थाध्यक्ष अरविंद लाठींविरोधात शिक्षणाधिकारी, संचालक व थेट मंत्री विनोद तावडेंपर्यंत तक्रार केली होती. त्याची चौकशी होऊन शाळेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. यादरम्यान, मुख्याध्यापक डी. एस. सरोदेंना निलंबित करण्यात आले. या वादातून शाळेचे पाणी बंद करण्यात आल्याचेही वृत्त पुढे आले होते. अद्यापही हा वाद कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com