अनिष्ट रूढी, परंपरांना छेद देणारे विद्यार्थी हेच खरे परिवर्तनाचे शिल्पकार -बी. बी. भिल

dhule
dhule

निजामपूर-जैताणे (धुळे) : समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना छेद देत आधुनिकतेची कास धरणारे विद्यार्थी हेच खरे परिवर्तनाचे शिल्पकार व देशाचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी व साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बी. बी. भिल यांनी केले. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आज (ता.27) आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. संस्थाध्यक्ष डी. एन. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कृषी, औद्योगिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्य असून विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे असेही गटशिक्षणाधिकारी श्री. भिल पुढे म्हणाले. शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, संस्थेचे उपाध्यक्ष सुहासभाई शाह, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, खजिनदार दत्तात्रय वाणी, सचिव नितीन शाह, संचालक बारीक पगारे, राजेंद्र वाणी, राघो पगारे, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक योगेंद्र राणे, केवबा बच्छाव, अशोक बोरसे, सुनील जगदाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुवंदना व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ शिक्षक प्रवीण शाह यांनी गुरुपौर्णिमेणनिमित्त 'गुरूमहात्म्य' सांगितले. संचालक बारीक पगारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी नववी ते बारावीच्या 50 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुमारे 175 रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या खुशबू कैलास मासुळे ह्या विद्यार्थिनीस मुख्याध्यापक जयंत भामरे यांच्यातर्फे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. निजामपूर केंद्रात बारावीतून सर्वप्रथम आलेला विद्यार्थी धीरज प्रदीप वाणी व दहावीतून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी स्नेहा योगेंद्र राणे यांच्यासह नववी ते बारावीतून प्रत्येक विषयातून व कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्य शाखेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त मुलामुलींना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक सत्यनारायण शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. भिकाजी गावित यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. विवेक बधान यांनी बक्षिसांचे वाचन केले. तर सुनील शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बक्षीस वितरण समितीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पाचवी ते बारावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com