इगतपुरी (जि. नाशिक) - शिक्षक म्हणून नोकरीस डिसेंबर 2013 नंतर मान्यता दिलेल्या पदांवरील संबंधित शिक्षक उमेदवार जर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (टीईटी) नसतील; तर त्यांचे वेतन मार्चनंतर काढण्यात येऊ नये, असे आदेश विविध जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षकांनी दिल्याने शिक्षकांच्या सेवा संपुष्टात येणार आहेत.
1 एप्रिल 2010 पासून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार प्राथमिक स्तरावरील निम्न प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर डी. एड. व शिक्षक पात्रता परीक्षा, उच्च प्राथमिक स्तरावर पदवीधर व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले. शासनाने यापूर्वीच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसेल, तर 31 मार्च 2019 पर्यंत पात्रता धारण करणे अनिवार्य केले होते. या दिलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवेतून कमी करण्याबाबतच्या सूचना यापूर्वी केल्या होत्या. तथापि, राज्यात अद्यापही मान्यता मिळाल्यावर पात्रता नसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी शासनाने आदेशित केल्यानंतर 31 मार्चपर्यंत जे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाहीत; त्यांचे वेतन मार्चअखेर काढण्यात यावे. त्यानंतर संबंधित शिक्षकाचे वेतन काढण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हा वेतन अधीक्षकांनी दिल्याचे वृत्त आहे.
|