चाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती 

chalisgaon
chalisgaon

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत गावात आठ दिवसांआड व ते देखील केवळ दहा मिनिटे पाणी मिळत आहे. गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटरवर असलेल्या अभोणे तांडा येथील पाचशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. या तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या आजुबाजूच्या शेतातून पाणी आणावे लागते. अभोणे तांडा हे कळमडू ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारे गाव असून तांड्याजवळच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी जेमतेम असल्याने त्या विहिरीवरून नळांना पाणी येते. मात्र, हे पाणी आठ दिवसांत दहाच मिनिटे मिळत आहे. 

पाण्याची टाकी ‘शो पीस’ 
तांडा वस्तीसाठी पाण्याची टाकी असली तरी तिचा काही एक उपयोग होत नाही. ती बांधल्यापासून आजपर्यंत या टाकीतून नळाला पाणीच आलेले नाही. ही टाकी ग्रामपंचायतीने आर. ओ. प्लानसाठी तयार केल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. सध्या या टाकीतून पाणीपुरवठा केला जात नसल्याने ही टाकी केवळ एक शोभेची वस्तू ठरल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल घेऊन या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे. 

विकत घ्यावे लागते पाणी 
तांडा वस्तीलगतच्या काही विहिरींना पाणी आहे. मात्र, ज्यांची आहे, त्यांनाही टंचाई भासेल यामुळे ते भरू देत नाही. जे काही जण भरू देतात परंतु विनवण्या कराव्या लागतात. यामुळे पन्नास रुपये खर्च करून दोनशे लिटर पाणी येथील ग्रामस्थांना विकत घ्यावे लागते. यामुळे आता विकत पाणी पिण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ तांडावासीयांवर आलेली आहे. 

तांडावासीय म्हणतात... 
दूरवरून पाणी आणताना हाल होतात 
सीताबाई पवार : तांड्यावर पाणीच येत नसल्याने दूरवर भटकंती करून पाणी आणावे लागते. बऱ्याचदा पाण्यासाठी रोजगाराला देखील मुकावे लागते. रणरणत्या भर उन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. दूरवरून पाणी आणताना आम्हा महिलांचे खुप हाल होतात. 

शोषखड्डे तयार करुन पाणीबचत 
जमनीबाई राठोड ः मला स्वतःला पाण्यासाठी माझे काय हाल होतात हे मलाच माहित. माझ्या घरासमोर मी चार बाय चारचा शोषखड्डा तयार केला आहे. घरातील वाया जाणारे पाणी या खड्ड्यात जाते. गावात आम्ही सर्वांनी शोषखड्डे तयार केले आहेत. प्रशासनाने आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी 

ग्रामस्थांना आजार जडत आहेत 
मालूबाई राठोड : आजुबाजुला असलेल्या विहीरीचे पाणी दूषित असल्याने सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला कमीत कमी शुद्ध पाणीपुरवठा करावा, जेणेकरून आमचे आरोग्य चांगले राहील व आम्हाला शुध्द पाणी तरी मिळेल. 

आम्ही तांडा वस्तीवरील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तहसील प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे. लवकरात लवकर येथील पाणीप्रश्न सोडवला जाईल. 
- कविता पाटील, सरपंच ः कळमडू (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com