नाशिक - पावसाळ्याचे 47 दिवस झाले असले, तरीही निम्म्याहून अधिक राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात सरासरीच्या 75.36 टक्के पाऊस झाला असला तरीही 355 तालुक्यांपैकी 41 तालुक्यांत 25 ते 50 आणि 154 तालुक्यांत 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली; तसेच पावसाच्या भरवशावर आतापर्यंत 74 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या, तरीही मका लष्करी अळीने अन् कापूस रस शोषणाऱ्या किडीने जर्जर झाला आहे.
राज्यात 1 जूनपासून 509 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत 384 मिलिमीटर पाऊस झाला. वर्धा जिल्ह्याची नाजूक स्थिती असून तिथे 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला; तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा जिल्ह्यात 75 ते 100 आणि शंभर टक्क्यांच्या पुढे ठाणे, पालघर, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात पाऊस झाला आहे. ही जरी परिस्थिती एकीकडे असली तरीही पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास हलक्या जमिनीतील पिके तग न धरता जळून जाण्याचे प्रमाण वाढणार आहे.
|