मुझफ्फरनगर : जाटलॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाजवादी पक्ष (सप) आणि राष्ट्रीय लोक दलाच्या (रालोद) आघाडीवर जोरदार टीका केली. उभय पक्षांमधील ही आघाडी मतमोजणी पूर्ण होईपर्यंतच टिकेल असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकरी संघटनांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुझफ्फरनगरमध्ये भाजपकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. (UP Assembly Election Updates)
शहा म्हणाले की,‘‘ राज्यात समाजवादी पक्षाने सरकार स्थापन केले तर आझम खान यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंतभाईंना बाहेरचा रस्ता धरावा लागेल. राज्यात ज्या पद्धतीने समाजवादी पक्षाकडून तिकिटांचे वाटप करण्यात आले ते पाहता सर्वसामान्य जनतेच्या देखील ही बाब लक्षात आली असेल.’’ शहा यांचे हे वक्तव्य जयंत चौधरी यांना खुले आमंत्रण असल्याचे मानले जाते. दुसरीकडे चौधरी यांनी मात्र भाजपसोबत आघाडी करण्यास याआधीच नकार दिला आहे. शेतकरी आंदोलनावरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
तर पुन्हा माफियाराज
‘‘योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशातील माफियाराज संपुष्टात आले असून याआधी येथे धर्म आणि जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांचे वर्चस्व होते पण ही स्थिती आता राहिलेली नाही. आता पुन्हा राज्यात ‘सप’ अथवा ‘बसप’ सत्तेमध्ये आला तर पुन्हा माफियाराज येईल पण येथून भाजप निवडून आला तर मात्र हे राज्य प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल.’’ असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
पश्चिम उत्तरप्रदेशातील दौऱ्यात शहांनी आज देवबंदला भेट दिली. या भागाला १९५२ नंतर भेट देणारे ते पहिलेच गृहमंत्री आहेत. शहा येथे जवळपास सतरा मिनिटे थांबले. येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते एकत्र आले होते, त्यामुळे त्यांना केवळ दहा मिनिटेच दारोदारी जाऊन प्रचार करता आला.
‘सप’ने हज हाऊस बांधले ः योगी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा समाजवादी पक्षावर टीका केली. राज्यात ‘सप’चे सरकार असताना हज हाऊसच बांधण्यात आले पण राज्यात भाजपची सत्ता येताच गाझियाबादेत मानसरोवर भवनाची निर्मिती करण्यात आली असे त्यांनी नमूद केले. योगींनी याबाबत ट्विट केले आहे.
ते म्हणाले, ‘‘समाजवादी पक्षाने नेहमीच भाजपच्या विरोधात कामे केली आहेत, अखिलेश यांचा पक्ष हज हाऊस उभारत असताना आम्ही मात्र ९४ कोटी रुपयांचा निधी खर्च करून गाझियाबादेत कैलास मानसरोवर भवनाची निर्मिती केली.’’
शहा म्हणाले
योगी आदित्यनाथ यांनी आश्वासने पूर्ण केली
राज्यातील गुन्हेगारी ७० टक्क्यांनी घसरली
मायावती या केवळ जातीचीच चर्चा करतात
येथील दंगलपीडितांच्या वेदनची मला जाणीव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.