'ते' पाच सेकंद आणि तब्बल ११९ जणांचा दुर्दैवी अंत...

199 people are no more so far in accidents on signal
199 people are no more so far in accidents on signal

नागपूर ः ट्रॅफिक सिग्नल्सवर लाल सिग्नलपासून हिरवा सिग्नल होण्यास केवळ ५ ते ६ सेकंदाचा वेळ शिल्लक असताना वाहनचालक भरधाव निघून जाण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे पिवळा सिग्नलमध्ये वाहनचालक गाडी सुसाट काढण्याचा प्रयत्न करतात. दोन्हीकडील वाहनचालकांच्या अतिघाईमुळे ‘त्या’ पाच सेकंदामुळे झालेल्या अपघातात राज्यात ११९ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी देशात पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यामध्ये तीन ते साडेतीन लाख नागरिक गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग होतात. जवळपास दीड लाख मुले अल्पवयातच मृत्युमुखी पडतात. राज्यभरात अपघाताचा आकडा मोठा आहे. मानवी चुका आणि अतिघाई या कारणांमुळे घडलेल्या अपघातांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये तब्बल १५५ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

राज्यातील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन विविध उपक्रम आणि जनजागृती करीत आहेत. मात्र वाहनचालकांची मनमनी आणि वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघात घडतात. त्यामुळे पोलिसांच्या योग्य अंमलबजावणीसह वाहनचालकांची सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे.

नागपूर जिल्ह्यातून मुंबई -कोलकता व दिल्ली -हैदराबाद हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. तसेच चार राज्य मार्गाने वाहतूक होते. शहरात झालेल्या अपघातात जानेवारी ते नोव्हेंबर -२०२० या कालावधीत १५५ मृत्यू झाले आहेत. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अपघातांवर नियंत्रण येऊन मृत्यूदेखील कमी आहेत. सर्वाधिक १२७ मृत्यू वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे झाले आहेत. तीन मद्यपानामुळे, नऊ झाड, इलेक्ट्रिक पोलवर धडकल्यामुळे, पाच मृत्यू उभ्या वाहनावर धडकल्याने, सहा मृत्यू ओव्हरस्पिड, तीन मृत्यू वाहन अनियंत्रित झाल्यामुळे आणि दोन मृत्यू दुसऱ्या वाहनाला सरळ धडक दिल्यामुळे झालेले आहेत.

अल्पवयीन व युवा चालक

नागपूर शहरात गेल्या दहा महिण्यात झालेल्या १४५ रस्ते अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला. या आकड्यांमध्ये अल्पवयीन मुले-मुली आणि तरूणांचा मोठा टक्का आहे. केवळ शायनिंग मारण्याच्या नादात अनेकांनी सुसाट वाहन चालवून तर काहींनी वाहन चालविता येत नसतानाही फक्त ट्राय केल्यामुळे झालेल्या अपघातात जीव गमावला आहे.

हे नक्की करा 

- दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा
- चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्‍ट लावा
- वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा
- वाहनांची दारे व्‍यवस्थित बंद असल्‍याची खात्री करा
- अमली पदार्थ व मद्यप्राशन करून वाहन चालवू नका
- वाहतूक नियमांचे पालन करा 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com