नागपूर : "हा देश एकात्म नाही' असे गोपाळ कृष्ण गोखले म्हणायचे. त्यांच्यामते देशामध्ये धार्मिक संघर्ष, दारिद्रय या समस्या होत्या. त्यांचे इंग्रजीवर प्रभूत्व होते. गोपाल गणेश आगरकर यांच्या मासिकाची ते इंग्रजी आवृत्ती काढत. आगरकर यांना ईश्वर, जुनी परंपरा मान्य नव्हती. त्यामुळे आगरकरांप्रमाणे लोकांचा रोष गोखलेंवरसुद्धा होता. विज्ञानवादी असल्यामुळे ते जास्त लोकप्रिय झाले नाही. त्यामुळे, गोखले एकाकी होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
अवश्य वाचा - ‘त्या’ विद्यार्थ्याचे पोहणे ठरले शेवटचे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर केंद्रातर्फे आणि स्वराज्य रिसर्च फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त "गोपालकृष्ण गोखले स्मृती समारोहा'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते "गोपाळ कृष्ण गोखले आजच्या राजकीय संदर्भात' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. तर, अनिल इंदाने, प्रेम लुणावत, संयोजक संदेश सिंगलकर मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले.
सुरेश द्वादशीवार म्हणाले, गोखले फार विद्वान आहेत, असे टिळक म्हणत. त्यांचे विचार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिहीलेले आढळून येतात. अभ्यासपूर्ण भाषण असल्यामुळे सामान्य लोकांना कळायचेसुद्धा नाही. गोखले इंग्रजी राज्याचे स्वागत करणारे होते. इंग्रजीला ईश्वरी राज्य ते मानत. गोखले आंदोलने, सत्याग्रहांमध्ये सहभागी नसायचे. उत्क्रांतीवादी असल्याने संघर्षाला अनुकूल नव्हते. प्रतिकार हा शब्द त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे, "गोखलेंच मवाळ पक्ष आणि टिळकांचा जहाल पक्ष', असे दोन गट निर्माण झाले होते. लोकनेता प्रतिकार करीत नसल्यास तरुणांचे नेतृत्व त्यांना प्राप्त होत नाही. हेच वातावरण आज देखील आहे. आपल्याकडे लोकनेत्यांपेक्षा प्रवचनकार प्रसिद्ध आहेत, असेही ते म्हणाले.
डॉ. गिरीश गांधी म्हणाले, राजकीय कार्यकर्त्याची कार्यशाळा घेतली पाहिजे, असे गोखले म्हणत. तत्त्ववेत्ताचे अनुसरण करणारा पूर्वीचा काळ होता. कार्यकर्त्यांनी अशा महापरूषांच्या विचारांचे अनुसरण करायला हवे, त्यांचे साहित्य वाचायला हवे. नाही तर डबकी तयार होतात. गोखलेंच्या वेळचा काळ भारावून जाणारा काळ होता. आधी वैचारिक मतभेद होते, आता सत्तेसाठी मतभेद निर्माण होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.