नागपूर : शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन आयोजित करण्यात येत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २० व २१ मार्चला यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे होणार आहे. या संमेलनात शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल, अशी माहिती शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नजीकच्या रावेरी या खेड्यात हे संमेलन होत आहे. स्वागताध्यक्ष म्हणून विजय निवल यांनी जबाबदारी स्विकारली आहे. कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, बाळासाहेब देशमुख यांनी विविध समित्यांचे गठण केले आहे. जयंत बापट, राजू झोटिंग, इंदरचंद बैद, वामनराव तेलंगे, नामदेवराव काकडे, राजेंद्र तेलंगे यांचा या समित्यांमध्ये समावेश आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ‘हिरव्यागार शेतीला हवा कार्बन क्रेडीटचा लाभ’, ‘कोरोनाचे शेतीवरील परिणाम’ ‘बाजारस्वातंत्र्य आणि नवे विधेयक’ ‘दडायचे नाही, आता भिडायचे’ यावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. तसेच संमेलनात शेतकरी गझल मुशायरा, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी कथाकथन व प्रकट मुलाखत असे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील एक हजारपेक्षा अधिक मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा विश्वास गंगाधर मुटे यांनी व्यक्त केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.