या शहरातील मुस्लिम परिसर मनपाने केला 'सील', हे कारण ठरले कारणीभूत

Citizens in Mominpura area of Nagpur banned from going out
Citizens in Mominpura area of Nagpur banned from going out

नागपूर : दिल्लीहून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मनपा प्रशासनाने तातडीने मोमीनपुरा परिसर सील केला आहे. या परिसरातील नागरिकांना बाहेर निघण्यास तसेच इतर नागरिकांना या परिसरात जाण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी मनपाने मोमीनपुरा परिसराच्या सर्वच सीमा रहदारीसाठी बंद केल्या आहेत. 

मनपाच्या प्रभाग क्रमांक आठमधील 32 वर्षीय तरुण काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आला. त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते. शनिवारी या तरुणाचे नमुने तपासले असता तो कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले. हा तरुण मोमीनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरातील रहिवासी आहे. दिल्लीहून आल्यानंतर तो अनेक दिवस याच भागात होता. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, यासाठी मनपाने तातडीने हा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मनपाने मोमीनपुरा येथील उत्तर पूर्वेकडील तीन खंबा चौक, दक्षिण-पूर्वेकडील नालसाहब चौक, दक्षिण-पश्‍चिमकडील भगवाघर चौक, पश्‍चिमेकडील जामा मशीद व उत्तर-पश्‍चिमकडील मोमीनपुरा चौक हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. या भागात येणारे सर्व मार्ग रहदारीसाठी बंद आहेत. या भागातील नागरिकांना या परिसराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, इतर भागातील नागरिकांनाही या परिसरात जाण्यास मज्जाव आहे. केवळ तातडीची वैद्यकीय सेवा तसेच अंत्यविधीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. 

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही या प्रतिबंधातून सूट आहे. डॉक्‍टर, नर्स, औषध विक्रेते दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट यांनाही या बंदीतून वगळण्यात आले आहेत. याशिवाय जीवनाश्‍यक वस्तू सेवा पुरवठा करणाऱ्यांना पोलिस पासशिवाय या भागात प्रवेश करता येणार नाही, असे मनपाने स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिकेने पोलिस आयुक्तांनाही पत्र दिले. आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे या पत्रात नमूद आहे. 

आयुक्तांच्या आवाहनालाही प्रतिसाद नाही

दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी तसेच रेल्वेने प्रवास करणारे सहप्रवासी यांनी स्वत: पुढे येण्याची गरज आहे. संबंधित व्यक्तींनी स्वत:बद्दल मनपा नियंत्रण कक्ष अथवा मनपाच्या आरोग्य विभागाला माहिती द्यावी. कोरोनाच्या विळख्यातून स्वत:सह कुटुंबातील नागरिकांनाही वाचविण्यासाठी पुढे या, असे आवाहन आयुक्तांनी केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

'वनामती'तील 105 जणांना स्थानांतरित करा

दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी 105 जणांना वनामती येथे ठेवले आहे. त्यामुळे धरमपेठ, भगवाघर, आंबेडकरनगर या भागातील नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. येथील 105 जणांना उप्पलवाडी व बिडगाव येथे बीएसयुपीअंतर्गत बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संजय बंगाले यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com