जलालखेडा (जि. नागपूर) : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी नरखेड तालुक्यात कपाशी व तुरीचे उत्पादन घटले. खरिपातील पिकालाही मोठा फटका बसला. अशातच हमीभावापेक्षा जास्त दर मिळाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीला कापूस व तुरीला खासगी बाजारात जास्त दर मिळाले नाहीत. आता खासगी बाजारात कापसाला व तुरीला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तूर व कापूस विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ दाखविली आहे.
शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या नाना प्रकारच्या घोषणा करीत असले तरी, मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक घोषणा अजूनही कागदावरच आहेत. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पावसाने सोयाबीन, कापूस व तुरीचे मोठे नुकसान झाले. परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. रब्बी हंगामातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्याची शक्यता नाही. अशातच खासगी बाजारात तुरीचे दर वाढल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने तुरीचे हमीदर सहा हजार रुपये निश्चित केले. त्यासाठी शासकीय हमीभाव केंद्र निश्चित केले होते. मात्र, सुरुवातीपासूनच खासगी बाजारात तुरीचे दर हमीभावाबरोबर होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजाराला पसंती दिली. यामुळे यावर्षी नरखेड तालुक्यात तूर विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही रोडावली आहे. अद्याप ही केंद्र ही सुरू करण्यात आले नाहीत. केंद्र सुरू झाले तरी त्याकडे जाणार सुद्धा नाही. हमीदरापेक्षा तुरीचे दर सध्या वर चढले आहेत.
खासगी बाजारात तुरीचे दर सहा हजार पाचशे रुपयांवर पोहोचले. सध्या हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना पाचशे रुपये जास्त मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी खर्चाच्या तुलनेत हे दरही कमी आहेत. पावसाने यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे. हमीभावापेक्षा थोडी रक्कम जास्त असल्याने खासगी बाजारात तुरीची आवक वाढली आहे. तर शासकीय हमीभाव केंद्र ओस पडली आहेत.
कापसाच्या बाबतीत झाले आहे. सुरुवातीला कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची धाव शासकीय केंद्राकडे होती. पण मागील काही दिवसांपासून खासगी बाजारात भाव वाढल्याने व आता तर ६२०० रुपये प्रती क्विंटल झाल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ दाखविली आहे.
मागील वर्षी जेथे नरखेड तालुक्यात शासकीय हमीभावाने १ लाख ८५ हजार क्विटंल कापसाची खरेदी झाली होती, तेथे यावर्षी फक्त ३५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली व आता कापसाची आवक शासकीय खरेदी केंद्रावर शून्य झाल्याने केंद्र ही बंद करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तुरीला मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. बाजारात कापूस व तुरीची आवक कमी झाल्याने खासगी बाजारात दर वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार येत्या काही दिवसांत कपाशीचे व तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.