तू खुद को पुलिस समज रहा है क्‍या? असं म्हणत घातला वाद अन्‌...

Five arrested for Quarrel in Nagpur
Five arrested for Quarrel in Nagpur

नागपूर : जगासह देशात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच आहे. दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण पाहून प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. दुसरीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणूण स्वत: अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आजवर घरीच राहणाऱ्या नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत आगाऊ पणा करायला सुरुवात केली आहे. याच आगाऊपणामुळे चांगलाच वाद निर्माण झाला... 

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून येतो, तेथे कठडे लावून रस्ता बंद केला जातो. बाहेरील नागरिक आत शिरू नये आणि आतील नागरिक बाहेर येऊ नये म्हणून असे केले जाते. यानंतर विविध उपाययोजन केली जाते. खबरदारीचा उपाय आणि दुसरा कोणी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येऊ नये म्हणून असे करण्यात येते.

तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर, मोठ्या चौकांत पोलिस कठडे लावून उभे आहेत. प्रत्येक नागरिकांना कोणत्या कारणाने बाहेर पडत आहे, असे विचारले जाते. विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा केली जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन, मनपा आणि पोलिस विभागाने काही रस्ते ब्लॉक केले आहेत. तसेच काही "रेड, ग्रीन' झोन तयार केल्यानंतर वस्त्या आणि परिसर सील केले आहेत. हीच संधी साधून काही टारगट युवकांनी आपापल्या गल्लीतील किंवा वस्तीतील रस्ते ब्लॉक करणे सुरू केले आहेत. 

कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण नसताना किंवा कोरोनाचा प्रभाव नसताना आपल्या परिसरातील रस्ते ब्लॉक दुसऱ्या नागरिकांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मात्र, याचा नाहक त्रास दुसऱ्याला सोसावा लागत आहे. काही विचारणा केल्यास त्यांच्याकडून भांडण करण्यात येते. यामुळे नागरिक मुकाटपणे निघून जातात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही रस्त्यांवर बांबू लावून रस्ता सील केला आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात काही नागरिकांनी स्वत:हून रस्ता बंद केला होता. आठ दिवसांपूर्वी गोलू राणे, विशेख सावरकर, आशीष सावरकर, लकी सावरकर आणि जितू राणे (सर्व रा. लालगंज, सुदर्शन कॉलनी) हे त्या रस्त्याने गेले असता त्यांना रस्ता बंद दिसला. त्यांनी वस्तीतील लोकांना विचारपूस केली असता कोरोनामुळे रस्ता बंद केल्याचे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. काही लोकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद टळला. 

रात्री मारले विटेचे तुकडे फेकून

रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पाचही जण दारू पिऊन पुन्हा वस्तीत गेले. यावेळी अशोक दशरथ खापेकर याच्याशी वाद घातला. "तू खुद को पुलिस समज रहा है क्‍या?' असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच विटेचे तुकडे फेकून मारले. तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाचही जणांना अटक केली. 

नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मिटला होता वाद

रस्ता बंद केल्यामुळे पाच जणांचा आणि परिसरातील नागरिकांचा वाद झाला होता. वाद वाढतच असल्याने काही नागरिकांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीमुळेच वाद शांत झाला होता. मात्र, पाचही युवकांनी रात्री दारूच्या नशेत वाद पुन्हा उकरून काढला. यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. शेवटी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

कारवाई करीत गुन्हे दाखल करणार

शहरात वाटेल त्या रस्त्यावर काही युवकांनी कोरोनाचे निमित्त साधून रस्ते बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना आवाजावी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, आता प्रशासनाच्या परवानगीशिवाय अवैधरित्या रस्ते "ब्लॉक' करणाऱ्यांची खैर नाही. अशा युवकांवर पोलिस थेट कारवाई करीत गुन्हे दाखल करणार आहेत. 

पाच ते सहा किलोमिटरचा फेरा

मोठमोठ्या रस्त्यावर हा प्रकार होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. अनेकांना जवळपास पाच ते सहा किलोमिटरचा फेरा मारून कार्यालय, प्रतिष्ठाण किंवा कामाचे ठिकाण गाठावे लागत आहे. हा सर्व प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागत असल्यामुळे रस्ते बंद करणाऱ्यासोबत वादही होत आहेत. रस्त बंद केल्याच्या कारणावरून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शांतीनगर पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता बंदसाठी परवानगी आवश्‍यक

शहरातील कोणता रस्ता बंद करावा किंवा कोणता परिसर सील करावा, याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासन हे मनपा आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने घेतात. त्यानंतर संबंधित रस्त्याबाबत नोटिफिकेशन प्रकाशित केले जाते. पोलिस प्रशासनाला आदेश देऊन रस्ता बंद करण्यात येतो. हा सर्व प्रकार नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन केला जातो. 

कुणीही रस्ते ब्लॉक करू नये 
प्रशासनाच्या परवानगीशिवाय कुणीही रस्ते ब्लॉक करू नये. विनाकारण रस्ते बंद करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल. अवैधरित्या रस्ता बंद केल्यास पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येईल. 
- नीलेश भरणे, 
अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com