नागपूर : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्या खाव्यात, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. मात्र, मार्केटमध्ये गेल्यावर भाज्यांचे भाव ऐकून अक्षरशः डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. पाचशे रुपयांत धड पिशवीभर भाजीपालादेखील मिळत नाही. अपवाद वगळता सर्वच भाज्या महागल्या आहेत. तुटपुंज्या बजेटमध्ये ताळमेळ बसविताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे.
भाज्यांचे दर वाढले की कडधान्यांवरच बहुतेकांचा भर असतो. मात्र, आता ती सोयदेखील राहिली नाही. तूर डाळीसह चना डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळही ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. महागाई व भाज्या महागल्याने अनेकांचे दोनवेळचेही खाण्याचे वांधे झाले आहेत.
उरलीसुरली कसर तेलाने भरून काढली आहे. सोयाबीन, जवस व फल्ली तेलही भडकले आहे. कोरोनामुळे खासगी कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे. मजुरांच्याही हाताला कामे नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
भाजी मार्केटचा फेरफटका मारला असता सर्वच भाज्यांचे दर दुपटीने व तिपटीने वाढल्याचे दिसून आले. एरवी ३० ते ४० रुपये प्रती किलोची फुलकोबी १०० ते १२० रुपयांवर गेली आहे. चवळी, भेंडी, पालक, कारले, शिमला मिरची, गवार, पत्ता कोबी, वालाच्या शेंगा, टोमॅटो, बटाटे व हिरवे मिरचीचेही ६० ते ८० रुपये प्रती किलो आहेत. कोथिंबीरीचेही (२०० ते २५० रुपये) भाव गगनाला भिडले आहेत. सध्याच्या घडीला केवळ वांगेच (४० रुपये) तेवढे स्वस्त आहेत. यामुळे ‘आता काय रोज फक्त वांग्याचीच भाजी खायची का?’ असा त्रासिक सवाल गृहिणींमधून पुढे येत आहे.
भाजीपाल्याचे चढे दर आणखी दहा पंधरा दिवस कायम राहणार आहे. हिवाळा सुरू झाल्याने मार्केटमध्ये हळूहळू आवक वाढून भाव कमी होईल, असे अजनी परिसरात फुटपाथवर भाजी विकणाऱ्या संगीता वानखेडे म्हणाल्या.
कोरोनामुळे पतीचा खासगी व्यवसाय सहा महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. भाजीपाला, किराण्यासह सर्वच वस्तू महागल्याने दोनवेळचे जेवणही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घरखर्च करायचा की मुलांचे शिक्षण, असा प्रश्न आहे.
- रूपाली सोनटक्के,
गृहिणी
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.