काय सांगाव राजेहो ! खरीप हंगामाची तयारी बघावी की, कापूस विकावा...

file
file

पाटणसावंगी (जि.नागपूर) :  एक महिन्यापासून लॉकडाउन असल्यामुळे कापूस खरेदी बंद होती. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून राहिला. आज नाही तर उद्या सीसीआयची खरेदी सुरू होईल, या आशेने शेतकऱ्यांनी एक महिना वाट पाहिली. परंतु, शेतीचा हंगाम एक महिन्यावर आल्याने बी-बियाणांची जुळवाजुळव करणे व बॅंकेचे कर्ज भरायचे असल्यामुळे शेतकरी खासगी कापूस विक्री केंद्राकडे वळले. मात्र, शेतकऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेत खासगी कापूस जिनिंग केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावाने खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेचणीचाही खर्च निघत नाही. मात्र, किती दिवस कापूस घरी ठेवणार आणि पैशाअभावी मिळेल त्या किमतीत कापूस विकत असून शेतकरी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आहे.

15 दिवसांत कसा लागेल नंबर?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही खरेदी करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले होते. त्याकडे लक्ष देऊन नंतर सीसीआयला कापूस विक्री करणे व खासगी जिनिंगमध्ये नोंदणी करण्यासाठी सावनेर तालुक्‍यात शेतकऱ्यांना "लिंक' देण्यात आली होती. ही लिंक शुक्रवारी (ता. 24) दुपारी उघडली आणि सोमवारी (ता. 27) बंद करण्यात आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणी होऊ शकल्या नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 3,600 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही दररोज 20 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेल, तरी 3,600 शेतकऱ्यांचा नंबर कधी लागेल, असा प्रश्न कापूस उत्पादकाला पडला. दरवषीं 15 मेपर्यंतच कापूस खरेदी करण्याची परंपरा आहे. एप्रिल महिना संपलाच असून, मे महिन्यात 15 दिवसांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा कापूस कसा खरेदी करणार, अशी बिकट परिस्थिती समोर आलेली आहे.

तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने विक्री
सीसीआयकडून चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भर सीसीआयच्याच केंद्रावर आहे. आधीच सीसीआयने लॉकडाउनमुळे खरेदी केंद्र उशिराने सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने विक्री करावा लागला. खासगी कापूस केंद्रावर दररोज 100 गाड्यांच्यावर शेतकऱ्यांचा कापूस 4,000 रुपये ते 4,500 रुपये प्रतिक्‍विंटल या दराने घेतला जात आहे. शासनाच्या हमीभावानुसार, 5,355 रुपये पहिल्या ग्रेडचा कापूस आहे. मात्र, सरकारी कापूस केंद्रावर 20 शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात असल्याने तालुक्‍यातील हजारो शेतकरी चिंतेत पडलेले दिसत आहेत.

हमीभावापेक्षा कमी भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधीच अवकाळी पावसाने अडचणीत आणले आहे. शासनाकडून अद्यापपर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यातच कापसाला हमीभावाएवढी रक्कमदेखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये. हमीभावापेक्षा कित्येक पटीने कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट चालविली जात आहे.

शासनाने लक्ष द्यावे
माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. नोंदणी झाली असून माझा नंबर 2-3 महिन्यांनी लागेल, तर माझ्या कापसाच्या वजनात घट होईल. शासनाने त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी.
-दिलीप गजानन मांगुळकर
शेतकरी, रा. चांपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com