समाजमन सुन्न! तिघांचेही मृतदेह एकामागे एक अन् नातेवाईक हुंदके देत फोडीत होते हंबरडा

Mass funeral on all three dead bodies
Mass funeral on all three dead bodies

मौदा (जि. नागपूर) : पोळ्याच्या पाडव्याला बुधवारी दुपारच्या सुमारास तीन युवकांचा शेतातील विहिरीत गुदमरून मृत्यू झाला. शेतातील विहिरीत विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता. तिन्ही मृतदेह पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढून रामटेक येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. उत्तरीय तपासणीनंतर तिघांच्याही पार्थिवावर शोकाकूल वातावरणात मौदा तालुक्यातील वाकेश्वर येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

मौदा तालुक्यातील धक्कादायक घटनेने वाकेश्वर येथे गाव शोकाकूल झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांवर जणू आभाळ कोसळल्यागत झाले. मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह ते चालवायचे. त्यांना चिमुकली मुले आहेत. हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची परिस्थिती आहे. तिन्ही मृत कुटुंबातील कर्ते पुरुष होते. नातेवाईक हुंदके देत हंबरडा फोडीत होते. आप्तस्वकीय त्यांना धीर देत होते. गावात दुःखाचे सावट पसरले होते.

आकाश भोजराज पंचबुद्धे, विनोद प्रभू बर्वे, गणेश मुन्नीलाल काळबांडे अशी विहिरीत गुदमरून मृत झालेल्यांची नावे आहेत. तिघेही गावातील बद्रीनारायण नेहरू सपाटे यांच्या शेतात रासायनिक फवारणी करण्यासाठी गेले होते. विहिरीत उंदीर दिसल्याने त्याला काढण्याच्या बेतात एका मागोमाग तिघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

तिघांच्या जाण्याने गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तिघांचेही मृतदेह गावातून एकत्र काढण्यात आले. जणू जत्रेचे स्वरूप यावेळी गावाला आले होते. मोठ्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. स्थानिक स्मशानभूमीत तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला.

तिघेही होते पट्टीचे पोहणारे

तिन्ही मृतांचा उत्तरीयतपासणी अहवाल अरोली पोलिसांना प्राप्त झाला असून, तिघेही पाण्यात बुडून मृत झाल्याचा अंदाज आहे. मात्र, यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. तिघेही पोहण्यात तरबेज असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे पाण्यात बुडून ते मृत झाले हे न पटण्यासारखे आहे. विहिरीतील पाण्याजवळ पोहोचण्याआधीच ते पडले. त्यामुळे विहिरीतील विषारी वायूमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असे बोलले जात आहे. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे ठाणेदार विवेक सोनवणे यांनी सांगितले.

मृत्यूचे निमित्त मात्र मूषक

विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमण झाले आहे. श्रीगणेशाचे प्रिय वाहन मूषक. गणेशाच्या स्थापनेत त्याचे महत्त्व असल्यामुळे त्याचे स्थान पूजेत आबाधित असते. परंतु, हा मूषकच कधीकाळी कोणाच्या मृत्यूचे कारण ठरत असेल तर... चूक तशी त्याचीही नाही. त्यांच्या मृत्यूचे निमित्त मात्र मूषकाचे.

एकामागे एक तिघेही उतरले

नेहमीप्रमाणे तिघेही मजूर बद्रीनारायण नेहरू सपाटे यांच्या शेतात धानाला रासायनिक खत देण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्याने एक मजूर उंदराला काढण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, तो बाहेर निघत नसल्याने त्याला काढण्यासाठी दुसरा आणि तिसरा मजूर विहिरीत उतरला. मात्र, विहिरीत गॅस असल्याने तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

गॅसमुळे गुदमरून मृत्यू!

शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि केमिकलची फवारणी केली जाते. शेतातील केमिकलयुक्त पाणी झऱ्यामार्फत विहिरीत जात असते. रासायनिक खते आणि केमिकल यामुळे विहिरीत गॅस तयार होतो. त्याचप्रमाणे विहिरीचा उपसा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात गॅस तयार झालेली असते. याच गॅसमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com