आम्हालाच सततच्या बत्तीगूलची शिक्षा का? नागपूरच्या 'या' भागातील नागरिकांचा संतप्त सवाल...

people in Nagpurs narendra nagar are in problem of daily load shedding
people in Nagpurs narendra nagar are in problem of daily load shedding

नागपूर : देशाला शंभर टक्के लोडशेडींगमुक्त करू असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत किती गाव आणि शहरे लोडशेडिंगमुक्त झाली आहेत हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. लहान गावांमध्ये तर ही समस्या आहेच मात्र आता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.   

विजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नरेंद्रनगरच्या काही भागातील नागरिक अगदी मेटाकुटीस आले आहेत. चार महिन्यांपासून रोजच दिवसातून दोन ते तीन वेळा वीज जाते. आम्हाला सततच्या बत्तीगूलची शिक्षा का, असा जळजळीत सवाल त्रस्त नरेंद्र नगरवासियांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - काळ्या तांदळाचा भात कधी खाल्ला का; आरोग्यासाठी सर्वोत्तम, हे आहेत फायदे...
 
नरेंद्रनगरातील शिल्पा सोसायटी तशी जुनीच वसाहत आहे. मात्र मार्च महिन्यापासून या भागात दररोज वीज जाऊ लागली आहे. वारंवारीता फारच वाढल्याने तक्रारींचा क्रम सुरू झाला. त्यामुळे समस्या मार्गी लागेल असा नागरिकांचा समज होता. पण, महावितरणने तो अगदी चुकीचा ठरविला. 

सकाळ, दुपार आणि रात्री अशा तिन्ही सत्रात नियमित वीजपुरवठा खंडित होतो. दरवेळी अर्धा ते एक तास वीज बंद असते. ऐन कामाच्या वेळीच वीज नसल्याने रहिवाशांच्या दिनचर्येवर परिणाम झाला आहे. महावितरच्या कार्यालयात जाऊन तक्रार केल्यास ट्रिपींगमुळे ही समस्या उद्‌भवत असल्याचे सांगितले जाते. ट्रिपींगमागील कारण मात्र अजून वीजकर्मचाऱ्यांना हुडकून काढता आले नाही. परिणामी ही समस्याही जैसे थेच आहे. 

अन्यथा नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करा 

लॉकडाऊनमुळे मर्यादित कर्मचारीच कार्यरत होते. यामुळे नागरिकांनी भर उन्हाळ्यातही उकाडा सहन केला. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतरही अडचणीतून मार्ग मात्र निघू शकला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्गही वीजेच्या लपंडावामुळे निट होत नाहीत. तातडीने प्रश्‍न मार्गी काढा अन्यथा वीजकर्मचाऱ्यांना नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. 
 
बिल घेताना, मग सेवाही द्या
 
लॉकडाऊननंतर अव्वाच्या सव्वा बिल पाठविण्यात आले. ग्राहकांनी ते वेळेत भरावेत यासाठी तगादा लावण्यात आला आहे. बिल नियमित घेता ना मग तेवढ्याच तत्परतेने सेवाही द्या, अशी मागणी येथील नागरिक नीलेश खाडे यांनी केली आहे. 

वसुली येवढीच तत्परता सेवेतही दाखवा
 
बिलाच्या वसुलीसाठी सतत तगादा लावला जातो. आता तर बिल भरण्यासाठी फोन करून ग्राहकांना भांबावून सोडले जात आहे. वसुलीसाठी करण्यात येणारी  घाई वीज ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेतही दाखवा, अशी येथील रहिवासी भावना प्रदीप अवचट यांनी व्यक्त केली आहे. 

कर्मचारी करतात तरी काय?
 
गेल्या 4 महिन्यांपासून साधी ट्रिपींगची समस्याही सोडविता येत नसेल तर कर्मचारी करतात तरी काय, असा सवाल नरेंद्र नगर येथील नागरिक विश्‍वनाथ धोटे यांनी उपिस्थत केला आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com