नागपूर ः शहरात 15 जुलैपर्यंत कोरोनाने 22 मृत्यू झाले. यात सर्वाधिक व्यावसायिकांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. कोरोना बळींच्या संख्येत बेरोजगार आणि गृहिणी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, राज्याच्या तुलनेत उपराजधानीत कोरोनामुळे मृत्युदर केवळ 1.1 टक्के असल्याने कोरोना बळीसंख्येवर नियंत्रणातही नागपूर आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. राज्याचा मृत्यूदर 4 टक्के आहे.
महापालिकेने 15 जुलैपर्यंत कोरोनाबाधित आणि मृत्युदराचे विश्लेषण केले. 15 जुलैपर्यंत शहरात 2,002 कोरोनाबाधित आढळून आले असून, 22 मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या व त्यातील मृत्यूच्या दराचाही महापालिकेने अभ्यास केला. राज्यातील बाधितांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर चार आहे, तर देशातील मृत्युदर 2.6 आहे. शहराचा मृत्युदर 1.1 असल्याचे पुढे आले. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे बळींची संख्याही राज्याच्या तुलनेतच नव्हे, तर इतर पालिकेच्या तुलनेतही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
22 पैकी सर्वाधिक 9 मृत्यू व्यावसायिकांचे आहेत. ही टक्केवारी 41 टक्के आहे. त्यानंतर बेरोजगार आणि गृहिणींच्या मृत्यूची टक्केवारी प्रत्येकी 18 टक्के आहे. बेरोजगार आणि गृहिणींची संख्या प्रत्येकी चार आहे. कोरोनामुळे मृत्यूमध्ये प्रत्येकी एक डॉक्टर, खासगी कार्यालयातील कर्मचारी, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी व निवृत्तांचा समावेश आहे. वयानुसार, मृत्यूचा विचार केल्यास 50 वर्षे किंवा त्यापुढील वयोगटातील 68 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला. यात 51 ते 60 वयोगटांतील मृत्यूची टक्केवारी 38 टक्के आहे. 21 ते 40 वयोगटांतील मृत्यूची टक्केवारी 18.2 तर 41 ते 50 या वयोगटांतील मृत्यूची टक्केवारी 13.6 आहे.
आतापर्यंत झालेल्या एकूण कोरोनाबळींमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. 77 टक्के पुरुषांचा मृत्यू झाला असून, 23 टक्के महिलांचा समावेश आहे. कोरोनाबळींमध्ये 17 पुरुष आहेत, तर 5 महिलांचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात आणि लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रत्येकी 11 जण कोरोनाचे बळी पडले.
झोननिहाय मृत्यूसंख्येत लक्ष्मीनगर, हनुमाननगर, नेहरूनगर व आशीनगर झोनमध्ये एकही मृत्यू नाही. सर्वाधिक नऊ मृत्यू गांधीबाग झोनमध्ये असून, टक्केवारी 41 आहे. धंतोली व सतरंजीपुरा झोनमध्ये प्रत्येकी 18 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला, तर धरमपेठ व लकडगंज येथे प्रत्येकी 9 टक्के आणि मंगळवारी झोनमध्ये बळींची टक्केवारी 5 आहे.
कोरोनाबळींमध्ये बीपी, हृदयाचा आजार असलेले, किडनीचा आजार, कॅन्सर तसेच मधुमेह असलेल्यांचा समावेश अधिक आहे. कोरोनाचे बळी ठरलेले 86 टक्के नागरिक विविध आजारांनी ग्रस्त होते. यात 41 ते 60 वयोगटांतील 9 जणांचा तर 61 वर्षांवरील 6 जणांचा समावेश आहे. केवळ 14 टक्के नागरिकांचा मृत्यू कोरोनाने झाला.
स्वतःची काळजी घेण्याची गरज
कोरोनाची वाढती बळीसंख्या चिंतेची बाब आहे. नागरिकांनी खोकला, ताप आल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. शेवटच्या क्षणात ही संधी नाही. नागरिक बिनधास्त वागत असून, लॉकडाउन करण्यास भाग पाडत आहेत. बळीसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने नियम पाळण्याची गरज आहे; अन्यथा कडक लॉकडाउन करावे लागेल.
- तुकाराम मुंढे,
मनपा आयुक्त
संपादन - निलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.