नागपूर : बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये देण्याची घोषणा शासनाने केली. परंतु, कोरोनामुळे मेल्यानंतर 50 लाख रुपये देण्यापेक्षा जिवंतपणी कोरोनाची चाचणी करा ना. कुटुंबप्रमुख मेल्यावर त्या पैशाचे लोणचे टाकायचे का? असा संतप्त सवाल तमाम पोलिस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा संपर्क कोरोनामुळे सील झालेल्या व्यक्तींशी जास्त असतो. तसेच सील झालेल्या वस्तीतील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुरक्षा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी पहिल्या फळीतील कोरोना योद्धे म्हणून पोलिस कर्मचारीच पुढे असतात.
त्यामुळे बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका जास्त असतो. राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू आल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मदतनीधी देण्याची घोषणा केली. या घोषणमुळे कुटुंबाला आधार होईल किंवा कुटुंबाचे कसे होईल? याचा प्रश्न मिटेल. परंतु, रेड झोनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोना होऊन मृत्यू येण्याची वाट पाहण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी.
जेणेकरून त्याच्यासह कुटुंबातील कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही. तसेच पोलिस ठाण्यातील अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनाही लागण होणार नाही. परंतु, शासन पोलिस कर्मचारी मरायची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल सोशल मीडियावरून सुरू असलेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी केला. अनेकांनी व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे.
कोरोनाचा रुग्ण आढळेल्या वस्ती सील केल्यानंतर तेथे खाकी वर्दी रात्रंदिवस पहारा देते. वस्तीतील वातावरणात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिसांकडे 20 रुपयांचे मास्क आणि सॅनिटायझरची बॉटल राहते. मात्र, ड्युटी संपल्यानंतर प्रत्येक पोलिस कर्मचारी काळजीत असतो. आपल्याला कोरोनाचा संसर्ग तर होणार नाही ना, असा प्रश्न त्याला पडतो. तो कुटुंबापासून अलिप्त राहतो. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे सर्व तो करीत असतो. यावरून तो दहशतीत जगत असल्याचे दिसते.
राज्यभरात 1666 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे जवळपास 12 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यूसुद्धा झाला. तरी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने पाऊल उचलले नाही. दुर्लक्षित घटक असलेल्या पोलिसांना पीपीई किट, हेडशिल्ड, उच्च दर्जाचे सॅनिटायझर आणि अन्य साहित्य पुरविल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या मृत्यू झाल्यावर पैसे दिल्यापेक्षा जिवंतपणी त्यांची चाचणी करणे किंवा आरोग्यावर खर्च करणे शासनाकडून अपेक्षित आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.