
नागपूर : मी नियमानुसार चालतो. चुकीचे ऐकून घेत नाही. "ऍडजेस्टमेंट' करीत नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने राज्य सरकारच्याच निर्देशानुसार अनावश्यक व अद्याप सुरू न झालेल्या कामांना मंजुरी देत नाही.
महापालिकेच्या कामकाजासंदर्भात बैठका सुरू असताना केव्हाही नगरसेवकांना भेटत नाही, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करतो, यात काही चुकत असेल, तर तुम्हीच सांगा. नसेल, तर लबाड कोण? हेसुद्धा तुम्हीच ठरवा, असे सांगून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी "सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सभागृहात झालेले सर्व आरोप खोडून काढले.
मी आयुक्त म्हणून रुजू झालो त्याच दिवशी महापौरांना भेटण्यासाठी फोन केला होता. मात्र, त्यांना वेळ नव्हता. नंतर मी कामात बिझी झालो. नगरसेवकांना भेटण्यासाठी निश्चित वेळ दिली आहे. अनेकजण मला या दरम्यान भेटून गेले. काही लोकांना मी केव्हाही भेटावे, असे वाटत असेल, तर ते मला मान्य नाही.
पालिकेच्या कामकाजासंदर्भात बैठका सुरू असताना मी कुणाला भेटणारसुद्धा नाही. मी सरकारचा प्रतिनिधी आहे. त्यांचे आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे माझी जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्यसुद्धा आहे. आजवर कोणी काय केले त्यावर मला भाष्य करायचे नाही. मात्र, माझ्या कार्यकाळात एकही चुकीची बाब होऊ देणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
नव्या कामांना मंजुरी कशी देणार?
30 लाख लोकसंख्येचे शहर आणि "अ' श्रेणीच्या मनपाचे बजेट फक्त दोन हजार सहाशे कोटींचे, ही लाजीरवाणी बाब आहे. त्यात कंत्राटदारांची 840 कोटी देणी आहेत. मनपाने 749 कोटींचा शिक्षण कर वसूल केला. मात्र, तो सरकारला दिला नाही. जीपीएफचे 65 कोटी भरायचे आहेत. त्यावर व्याजही द्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत नवी कामे हाती कशी घेणार? घेतली, तर पैशासाठी कंत्राटदार तगादा लावेल. त्यात कोरोनामुळे अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत अत्यावश्यक कामे करणेच अपेक्षित आहे. तसे स्पष्ट आदेश सरकारचे आहेत. मी कुठलेही अत्यावश्यक कामे थांबविले नाही. जी कामे सुरूच झाली नाहीत, आणि जी तातडीच्या गरजेची नाहीत, तीच फक्त रोखली आहेत. आणखी नवे काम काढल्यास उद्या कर्मचाऱ्यांना वेतनसुद्धा देता येणार नाही. मेट्रो रेल्वेच्या करारातच आपल्याला इमारत शुल्क शंभर टक्क्यांनी वाढवायचा होता, जीपीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये का भरला नाही, कोणाचा दबाव होता, हेसुद्धा तपासावे लागेल, याकडेही मुंढे यांनी लक्ष वेधले.
फेसबुक पेजशी संबंध नाही
माझे ट्विटर हॅंडल आणि फेसबुक पेज ही दोनच अधिकृत खाती आहेत. बाकी सोशल मीडियावर कोण, काय पोस्ट टाकतो, याचा माझ्याशी संबंध नाही. ज्यांना कोणाला बदनामी केली जात आहे असे वाटत असेल, तर त्याने तक्रार करावी. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोणाची बदनामी वा राजकारण करायला नाही, तर काम करायला आलो आहे.
कोणाशीच वैर नाही
माझे सत्ताधारी असो वा विरोधक, कोणाशीच वैर नाही. मी मनपाच्या हितासाठी रोडमॅप तयार केला आहे. यापेक्षा चांगला मार्ग कोणाकडे असेल, तर सांगावे. त्याचे निश्चितच स्वागत आहे. कामे कुठली करायची, त्यासाठी पैसा कुठून येणार, नियमितता आणि जनहित एवढेच आपण तपासू. कामे रोखून आणि लोकांना अंगावर घेऊन मला आनंद मिळत नाही. जनतेला न्याय देणे आपले कर्तव्यच नव्हे, तर भूमिकासुद्धा आहे. त्याकरिता कितीही त्रास सहन करायची आपली तयारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.