वर्षभरापूर्वी कोसळला पूल; वारंवार होताहेत अपघात, तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

When will the bridge be built
When will the bridge be built

कामठी (जि. नागपूर) : पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या कामठी तालुक्यातील धारगाव ते नागपूर-जबलपूर बायपास चारपदरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल निकृष्ट कामामुळे वर्षभरापूर्वी कोसळला. परंतु, अद्याप पुलाचे बांधकाम सुरू केलेले नसल्याने धारगाव गावातील नागरिकांसह या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

या जीवघेण्या पुलाखाली कित्येक किरकोळ अपघात होतात. बुधवारी एका चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने धारगावमार्गे नागपूरकडे जात असलेली कार अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली. मात्र, वाहनचालकाच्या सतर्कतेने जीवित हानी टळली. वर्ष लोटले तरी प्रशासनाला बांधकामाचा मुहूर्त मिळत नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर-जबलपूर चौपदरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल निकृष्ट कामामुळे मागील वर्षी कोसळला. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यापुढे पूल टिकू शकला नाही. कामठी-घोरपड-धारगाव ते नागपूर-जबलपूर बायपास चौपदरी महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले.

पण ठेकेदाराने निकृष्ट काम केले. सिमेंटीकरण बांधकाम निकृष्ट असल्याने चौकशीची मागणी होत होती. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने पूल कोसळला. विशेष म्हणजे या मार्गावरून कामठीवरून नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

धारगाव येथील नागरिकांची या पुलापलीकडे शेती आहे. या सर्वांना गावाच्या पलीकडून चार किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. पूल कोसळला तेव्हापासून या पुलाचे बांधकाम नव्याने सुरूच करण्यात आले नाही. तरी पुलाच्या पलीकडील रस्त्यावर काम सुरू असल्याचे फलक लावण्यात आले आहे.

हा धारगावमार्गे नागपूर जबलपूर बायपास मार्गाला जोडणारा जलदगती मार्ग असल्याने बहुदा नागरिक या मार्गाने मार्गक्रमण करतात. मात्र अनोळखी व्यक्ती या मार्गे आल्यास त्याचा घात होण्याची शक्यता असते. वर्षभरात कित्येक अपघात झाले असून, अनेकांना अपंगत्व आले असल्याचे सांगण्यात येते. या पुलाखाली बळी जाईल तेव्हा बांधकाम करणार का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. 

ठेकेदारावर कारवाईची मागणी

ठेकेदाराने दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे सिमेंटीकरण करताना कोणत्याही लोखंडी साहित्याचा वापर केला नव्हता. पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पायल्यावरच सिमेंटीकरण करून काम पूर्ण केले. त्यामुळे एक वर्षातच पूल कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याबाबत अनेकदा संबंधित विभागाचे अधिकारी व गावातील सरपंचांकडे तक्रार केली, परंतु कारवाई करण्यात आली नसल्याने गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम अधिकाऱ्याची चौकशी करा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com