"साहेब, आठ दिवसांत कामावर घ्या अन्यथा आत्मदहन करू"; तीन वर्षांपासून कमी केलेल्या कामगारांचा इशारा 

10 workers gave threat to end their life in wardha
10 workers gave threat to end their life in wardha

देवळी (जि.वर्धा) : तालुक्‍यातील आणि शहरातील 109 कामगारांना व्हिल्स इंडिया कंपनीने अचानक कमी केले. आयुष्य सुरळीत सुरू असलेल्या या कामागारांच्या कुटुंबाला याचा चांगलाच धक्‍का बसला. अचानकपणे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे हतबल झालेल्या कामगारांनी कंपनी प्रशासनाला इशारा देत आठ दिवसात कामावर घ्या अन्यथा कंपनीच्या गेटसमोर आत्मदहन करू असा इशारा दिला. 

गत सात वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना अचानक कमी केल्याने या कमगारांनी जिल्हा कामगार अधिकारी, तहसीलदार, कंपनी प्रशासन व अनेक संघटनांकडे पूर्ववत कामावर घेण्यासाठी उंबरठे झिजविले. एकदातर कंपनी प्रशासनाने जिल्हा कामगार अधिकाऱ्यासमोर 15 दिवसांत कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे लिखित आश्वासन सुद्धा दिले. परंतु कामगारांना काम मिळाले नसल्याने हे आश्‍वासन हवेतच विरले. 

आतापर्यंत मिळालेल्या सर्वच आश्वासनांना तीन वर्षे पूर्ण होत आहे. 109 कामगारांपैकी 10 कामगार पूर्ववत व्हिल्स इंडिया मध्ये काम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. अखेरीस या 10 कामगारांना व्हिल्स इंडिया कंपनीने आठ दिवसांत कामावर पूर्ववत रुजू न केल्यास कंपनी गेटसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यावेळी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात कामगारांनी कंपनी प्रशासनाची भेट घेत निवेदन सादर केले.

कंपनीने युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व कामगारांना कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट यांच्याशी उद्या सकाळी 11 वाजता चर्चा करण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या पुढाकाराने कंपनी प्रशासन, कामगार व युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. मात्र, त्या बैठकीमध्ये कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे कुठलाही पर्याय निघाला नाही. शेवटी कामगार आपल्या सामूहिक आत्मदहन आंदोलनावर ठाम आहे. 

यावेळी किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, वैभव नगराळे, उमेश बोरकर, अफसर, समीर मानकर, राकेश भगत, श्रीकांत सोनटक्‍के, अभय ताकसांडे, अरविंद राजूरकर, जयंत चव्हाण, नितीन खारकर, सूरज लेवाडे, किरण फुलमाळी, महेश फटींग, नितीन ठाकूर, मोहमद शेख, मोहित कोसे, सागर पाल यांची उपस्थिती होती.

99 कामगारांचे कामाच्या शोधत स्थलांतर 

कंपनीतून कामावरून कमी केलेल्या कामगारांनी रोजगाराच्या शोधात स्थालंतरण केले. आतापर्यंत 99 कामागारांनी शहर सोडले. उर्वरित दहा कामगार येथे रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com