अमरावती ः जिल्ह्याच्या मोर्शी-वरुड तालुक्यातील नागरिकांना केवळ सहा किलोमिटरच्या रस्त्यासाठी तब्बल शंभर रुपये टोल टॅक्स द्यावा लागत असल्याने नागरिक संतप्त झाले असून आता टोलमुक्तीचा लढा तीव्र करण्यात आला आहे. येत्या 16 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराच्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून हा लढा सुरु असून वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने झाली आहेत. विविध पातळ्यांवर आंदोलन करण्यात आल्यावर सुद्धा शासन किंवा प्रशासनाने अद्यापही मोर्शी तसेच वरुडच्या नागरिकांची ही समस्या निकाली काढलेली नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाला सुरवात झाली आहे.
आजच जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्यावर आता 16 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्री. गडकरी यांनी टोकमुक्तीचे आश्वासन दिले होते असा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे. टोलमुक्तीचे हे आंदोलन 25 जानेवारीपर्यंत चालणार असून शेवटच्या दिवशी तिरंगा आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
अमरावती-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग खासगी कंपनीच्या माध्यमाने तयार करण्यात आला. त्यामुळे अमरावतीच्या पुढे असलेल्या नांदगावपेठ येथे टोल नाका उभारण्यात आला. या मार्गावरूनच मोर्शी-वरुडच्या नागरिकांना जावे लागते. परंतु ते केवळ सहा किलोमिटरच राष्ट्रीय महामार्गाचा वापर करतात. दुसरीकडे नागपूर मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना तळेगाव पर्यंतचा 60 किलोमिटर अंतराचा टोल सुद्धा शंभर रुपयेच पडतो.
नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रहाटगाव तसेच अर्जुननगरातील नागरिकांना पोलिस ठाण्यात जायचे असल्यास देखील टोल भरावा लागतो, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून मोर्शी-वरुड मधील सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.