वर्धा : वीजबिल भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति वीजबिल 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा वर्ध्यातील 220 ग्राहकांनी लाभ घेतला आहे. महावितरणने सुरू केलेल्या "गो ग्रीन' योजनेला वर्धेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे 21 हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपुरात 630 आणि वर्धा जिल्ह्यात 220 अशा एकूण 850 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत 10 रुपयांची बचत केली आहे.
वीजबिल ऑनलाइन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ऍपसह महावितरणच्या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, जे ग्राहक "गो-ग्रीन' सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना 1 डिसेंबर 2018 पासून प्रतिबिल 10 रुपये सवलत दिली जात आहे. "गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍप अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.
पर्यावरण संवर्धनाला हातभार
"गो-ग्रीन'चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबिल मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. "गो-ग्रीन'चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित "गो-ग्रीन' सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.