अग्रवालच्या आत्महत्येचा "कर्नाटक एम्प्टा"शी संबंध!

File photo
File photo

चंद्रपूर, : भद्रावती येथील कर्नाटक एम्प्टाच्या बंद खाणीतील कोट्यवधी रुपयांचा कोळसा खासगी वीज कंपन्यांना विकण्यात आला. या अनधिकृत व्यवहाराचा लेखाजोगा अशोक अग्रवाल याच्याकडे होता. यातील एका व्यवहारातील चार कोटी रुपयांचा ताळेबंद जुळत नव्हता. ती रक्कम अशोक अग्रवाल याने उडविली, या संशयावरून त्याचा छळ सुरू झाला. हा जाच सहन झाला नाही. त्यामुळे अशोकने आत्महत्या केली, असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला कोळसा तस्करीची किनार असल्याची शक्‍यता बळावली आहे.
येथील स्वामी फ्युएल नामक कंपनीत अशोक अग्रवाल "अकाउंटंट' होता. त्याने शुक्रवारी (ता. 27) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार तो बघायचा. एका व्यवहारात चार कोटींची तूट निघाली. यात अशोकचा हात असावा, असा संशय कंपनीच्या भागीदारांना होता. त्यांच्याकडून त्याचा छळ सुरू झाला. आत्महत्येपूर्वीच्या रात्री त्याला प्रचंड मारहाण केली. घराची झडती घेतली. त्याचा लॅपटॉप जप्त केला. हा छळ त्याच्या कुटुंबीयांसमोर केला गेला. अपमान सहन न झाल्याने आत्महत्या करण्यासाठी अशोक रेल्वेरुळावर गेला. त्याला या भागीदारांनी पकडून आणले आणि पुन्हा मारहाण केली, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. मात्र, आपल्याला हाच त्रास पुन्हा भोगावा लागेल, या भीतीने त्याने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एका मित्राशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. याचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. यात कंपनीचे लोक मला फसवीत आहेत. आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे म्हणून तो ढसाढसा रडत होता. यासंदर्भात मृतक अशोकचा भाऊ विक्की अग्रवाल यांनीही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याच्या आत्महत्येला जबाबदार लोकांचा कोळसा तस्करी आणि हवालाचा व्यवसाय आहे. ते माझ्या भावाला फसवीत होते. ते त्याच्या आत्महत्येला जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक एम्प्टाच्या बंद खाणीतील कोळसा चोरीची जबाबदारी तुकुम येथील एका मोठ्या भंगार व्यावसायिकाच्या भावाला देण्यात आली होती. तोही या घटनेतील महत्त्वाचा दुवा असल्याचे समजते.

"सुसाईड नोट' गायब
अशोक अग्रवालने आत्महत्येपूर्वी लिहिलेली "सुसाईड नोट' समाज माध्यमांवर फिरत आहे. परंतु, याची अधिकृत प्रत अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. याबाबत पोलिसांनी काही लोकांना विचारपूस केली. हाती ठोस काहीच लागले नाही. त्याने आपल्या हातावरसुद्धा माझ्या मृत्यूला कंपनीच जबाबदार असल्याचे लिहून ठेवले आहे. सुसाईड नोट मिळाली नाही तर यात नावे असलेल्या लोकांची चौकशी सुरू करणार, असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणात ज्या चार लोकांनी नावे आहेत, ती कोळसा व्यापारातील बडी नावे आहेत. त्यांच्यासोबत भाजपच्या एका नेत्याची अनधिकृत भागीदारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवरही दबाव असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com