गडचिरोली : मुंबईत बसणे व पालकमंत्री नेमून काम करवून घेणे यात फरक आहे. दोन व्यक्ती मुंबईत बसून मंत्र्यांविना राज्यातील ३७ जिल्ह्यांचा कारभार कसा पाहू शकतात. यामुळे सरकार आणि प्रशासनाचा बोजवारा उडताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप पंचनामे झाले नाही. केवळ शेतकऱ्यांचे आधारकार्ड आणि अर्ज घेण्यात येत आहेत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. (Ajit Pawar Marathi News)
अजित पवार हे गुरुवारी (ता. २८) पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात आले होते. स्थानिक सर्किट हाउस येथे पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांनी सुरुवातीला शिवणी गावात जाऊन पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी मिळणार? निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजारांची मदत सरकारने शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. ‘शिंदे गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत’, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर भाष्य करताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
मेडीगड्डा धरण समस्या झाली
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगणा राज्य सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा या महाकाय धरणामुळे सिरोंचात भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करण्यासाठी असे धरण बांधताना त्याचा फटका दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना बसणार नाही, याची दक्षता तेलंगणा सरकारने घ्यायला हवी होती. हे धरण आता एक मोठी समस्या झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.