गोडसेंचीही भारतरत्नसाठी शिफारस करा

मनिषतिवारी
मनिषतिवारी

नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपच्या काळात सर्वसामान्यांचे घामाचे पैसे बॅंकेतही सुरक्षित नाही. त्यावर डल्ला मारण्याचे काम केले जात असून, पीएमसी बॅंक घोटळ्याचाही त्यांनी उल्लेख केला. पीएमसी बॅंक बुडाल्याने तीन खातेधारकांचा मृत्यू झाला. सामान्यांचे पैसे या बॅंकेत आहेत. त्या पैशाचा वापर त्यांनाच करता येत नाही. याबद्दल राज्य आणि केंद्राने बोलणे अपेक्षित आहे. भाजपला देशाची अर्थव्यवस्था चालविता येत नाही. अर्थव्यवस्थेच्या चार मूलभूत गोष्टी आहेत. त्यात बॅंकेमधील बचत, खर्च, गुंतवणूक आणि रोजगार यांचा समावेश आहे. या चारही मूलभूत गोष्टींवर सरकारने घाला घातला. रोजगाराचा निर्देशांक गेल्या चाळीस वर्षांत सर्वांत वाईट स्तरावर आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांची क्रयशक्‍ती घटली आहे. भाजपने 2015 साली घोषणापत्रात पाच वर्षांत दहा कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन होते. ते पूर्ण करण्याचे सोडाच, पण आहे ते रोजगारही सरकारने संपविले आहेत. हीच परिस्थिती देशाची राहिल्यास काही महिन्यांनी अर्थव्यवस्था कोसळेल, असे भाकीतही तिवारी यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत प्रवक्ते आशीष दुआ, डॉ. आशीष देशमुख, विशाल मुत्तेमवार उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांत देशात कुठलीही मोठी गुंतवणूक नाही. याला येथील सांप्रदायिक वातावरण जबाबदार आहे. भाजपच्या धोरणामुळे परदेशी गुंतवणूक घटली. राज्यातही मिहानमध्ये एकही नवा उद्योग सुरू झालेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी 50 हजार रोजगार देणार होते. त्याचे काय झाले? असा प्रश्‍न खासदार मनीष तिवारी यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com