File photo
File photo

Vidhan Sabha 2019 रिपब्लिकन पक्षांचा उपयोग मतविभाजनासाठीच

अमरावती : अमरावती जिल्ह्यात मोठी शक्ती असलेली आंबेडकरी विचारांची चळवळ राजकीयदृष्ट्या विविध गटातटात विखुरली गेल्याने क्षीण झाली आहे. नेतृत्वासाठीच्या भांडणामुळे कायम कुणाच्यातरी आधाराने राहत आल्याने स्वतःची शक्ती गमावत आताची रिपब्लिकन चळवळ स्वयंभू बनू शकली नाही. आताही प्रमुख चार नेत्यांच्या नेतृत्वात राजकीय आखाड्यात असली, तरी आधार मात्र इतरांचा आहे. वंचितने स्वबळावर लढण्यासाठी उडी घेतली असली, तरी शिक्का मात्र दुसराच लागला आहे. केवळ मतविभाजनासाठी रिपब्लिकन पक्षांचे अस्तित्व बनले आहे.
जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास फार मोठा आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात या चळवळीचे मोठे योगदान राहिले आहे. त्या वेळीच राजकीय क्षेत्रात मोठे वलयही प्राप्त झाले. मात्र, राजकीय धुरिणांनी मोठ्या खुबीने व कौशल्याने या चळवळीचा उपयोग स्वतःसाठी करून घेत आंबेडकरी चळवळीला अंतरावर ठेवण्यात यश मिळवले. चळवळीतच नेतृत्वाची खेळी करून ती गटातटात विखुरण्यास मदत केली. परिणामी या चळवळीला स्वतःचे अस्तित्व असले तरी शक्ती मात्र दाखवता आली नाही.
रा. सू. गवई, रामदास आठवले, ऍड. प्रकाश आंबेडकर व जोगेंद्र कवाडे यांचे नेतृत्व उभे झाले. मात्र, त्यांना राजकीय क्षेत्रात आधारानेच स्थान मिळवावे लागले, ही शोकांतिका ठरली. ती आजही कायम आहे. त्यांच्या नेतृत्वात तुकड्यातुकड्यात विखुरलेली चळवळ आजही एक होऊ शकली नाही. राजकीय क्षेत्रात "रिपब्लिकन' नाम धारण करून उतरलेल्या चळवळीत बेकी निर्माण झाल्याने मतविभाजनाचा लाभ नेहमीच इतरांच्या पथ्यावर पडला. ती कायम राहावी, असे प्रयत्न राजकीय धुरिणांनी नेहमीच चालू ठेवले आहे.
यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षांची अनेक शकले बघावयास मिळत आहेत. रिपब्लिकन पक्षांना आपल्या बाजूने घेण्यासाठी आधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व नंतर शिवसेना व भाजपने प्रयत्न केले. दुभंगलेल्या या पक्षातील एक-दोन गट त्यांना मिळवता आले. सद्यःस्थितीत आठवले भाजप, तर कवाडे राष्ट्रवादीकडे आहेत. गवई कधी आघाडीत, तर कधी स्वतंत्र आहेत. अमरावती जिल्ह्यात त्यांनी दोन जागा स्वबळावर लढवत इतर जागी आघाडीला पाठिंबा दिल्याने त्यांची नेमकी भूमिका काय, असा प्रश्‍न आहे. ऍड. प्रकाश आंबेडकरांनी सर्वच जागी उमेदवारी दिली. काही जागी त्यांचे उमेदवार मैदानातून बाहेर पडले. विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीला एकत्र आणण्याचा प्रयोग बसपने केला. प्रारंभी त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. कॅडर तयार करता आले. मात्र, ते आता मर्यादित स्वरूपात झाले आहे. व्यापक रूप मिळविण्यात त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे शक्ती असूनही आंबेडकरी व नंतर राजकीय क्षेत्रात रिपब्लिकन बनलेल्या या पक्षांत एकी निर्माण होऊ न शकल्याने त्यांची शक्ती इतर पक्षांसाठी वापरली जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाची वाट धरली असली, तरी आधाराचा शिक्का मात्र त्यांच्याही माथी आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com