नागपूर - येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत असून, दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून या दिवशी पंतप्रधानांनी देशभरात दारूबंदी लागू करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज येथे केली.
दारूमुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रकाराला वेळीच प्रतिबंध लावण्याची गरज असून, त्यासाठी संपूर्ण दारूबंदी हाच पर्याय आहे. राजकीय नेत्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज असताना तेच दारूविक्रेत्यांना छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.
नशामुक्त भारत आंदोलन राष्ट्रीय संमेलन सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडले. या वेळी त्या बोलत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गावरील दारूदुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. यानंतर राज्यातील सरकारे ही दुकाने कशी सुरू राहतील, यासाठी प्रयत्नरत आहेत. तर काही राष्ट्रीय महामार्गांवरील दारू दुकाने बंद केल्याचे सांगून यातून पळवाट शोधत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.
शेतकरी आत्महत्या वाढल्या
शेतकऱ्यांवरील वाढते कर्जाचे डोंगर, नापिकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. नैराश्यामुळे तो व्यसनाच्या आहारी जात आहे. परिणामी शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. एका आकडेवारीनुसार 7.27 टक्के शेतकरी आत्महत्या या दारूमुळे झाल्याचे पाटकर यांनी सांगितले.
|