बुलडाणा - वेगळ्या विदर्भाबाबत आग्रही वाटणाऱ्या भाजपची मंडळी सत्ता येताच बदलली कशी; याबाबत आश्चर्य व्यक्त करत बहुतेक सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याने "विदर्भ आत्मबळ यात्रा' काढावी लागली, असे आमदार आशिष देशमुख यांनी आज (ता. 7) बुलडाण्यात सांगितले.
आत्मबळ यात्रेची माहिती देण्यासंदर्भात स्थानिक पत्रकार भवनात आज पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. या वेळी कॉंग्रेसचे धनंजय देशमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते. आमदार देशमुख पुढे म्हणाले, की विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, बोंड अळीने झालेले नुकसान, फवारणीदरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही तसेच कायम आहेत. कृषिमंत्र्यांना कोणत्याच गोष्टीचे गांभीर्य नाही. जे आश्वासन देऊन आम्ही निवडून आलो, त्याचा जबाब मतदारांना देण्याची जबाबदारी आमची असल्यामुळे आम्ही त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहोत. यामध्ये पक्षाला विरोध करण्याचा प्रकार नसून; मात्र ज्या मतदारांच्या बळावर सरकार आहे, त्यांना गृहीत धरून चालणार नाही. आमदारकी किंवा इतर काही सोडण्याचे सर्व पर्याय आपल्यासमोर खुले असल्याचे सांगून ते म्हणाले, वेगळा विदर्भ पूर्ण झाल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे अशक्य आहे. मोठा गाजावाजा करत "मेक इन इंडिया'च्या नावावर विदर्भात एक लाख दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्याची भाषा सरकारच्या वतीने करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र दहा हजार कोटींचीदेखील गुंतवणूक करण्यात आलेली नाही.
|