आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले.
भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता येथील गांधी चौकात शुक्रवारी (ता. 18) आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार दादाराव केचे, सुधीर दिवे, संदीप काळे, राहुल ठाकरे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, विजय बाजपेयी, अनिल जोशी, विनय डोळे यांची उपस्थिती होती.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, कॉंग्रेस नेतृत्व दिशाहीन झाले आहे. मोदींचा द्वेष करीत करीत ते राष्ट्राचा, महाराष्ट्राचासुद्धा द्वेष करीत आहेत. देशातील 15 श्रीमंत लोकांची मदत केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, एकेकाळी भारताची तिजोरी सांभाळणारे कॉंग्रेसचे भ्रष्ट नेते आज कारागृहात बंद आहेत, हे त्यांना दिसत नाही. कॉंग्रेसने सत्तेचा लाभ घेऊन गरिबांना लुटण्याचे कामे केले. मात्र, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने 2014 मध्ये 37 हजार कोटी, तर 2015-16 मध्ये 58 हजार कोटी रुपये थेट गरिबांच्या खात्यात जमा केले. ज्या महाराष्ट्रात कधी वीज जाईल याचा भरवसा नव्हता, त्या महाराष्ट्रात पाच वर्षांत 25 हजार मेगावॅट वीज निर्माण होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत तीन लाख 70 हजार कोटींची उद्योग क्षेत्रात गुंतवणूक झाली. त्यांच्या काळात सरकारी शाळेत गरीब विद्यार्थी तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकत नव्हते. फडणवीस सरकारने 65 हजार विद्यार्थ्यांना डिजिटल शाळेची सोय करून दिली. देशाची व महाराष्ट्राची वाटचाल विकासाच्या दिशेने करायची असेल तर तुम्हाला भाजपला मतदान करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.