लॉकडाउनमध्येही चरखा संघाने दिला महिलांना रोजगार 

file photo
file photo

मूल(चंद्रपूर): 1958 मध्ये स्थापन झालेल्या नाग विदर्भ चरखा संघास सद्यस्थितीत उत्पादन क्षमतेचा फटका बसला आहे. आजही येथे 20 ते 25 घरांमध्ये आधुनिक चरख्यावर सूतकताई केली जाते. यातून येथील महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. कोरोना महामारीच्या काळातही येथे घरोघरी सुतकताई सुरू होती. 
कच्चा माल घरी नेवून त्यातून सूतगुंडी तयार केल्या जाते. एक महिला सूत कारागीर दर पंधरवडयाला 950 रुपयांची कमाई करते. येथे सूतकताई होत असली, तरी विणकरांचा मोठा अभाव सातत्याने जाणवत आहे. याआधी तालुक्‍यातील मूल, मारोडा, विरई, हळदी या भागात विणकरांकडून खादीचे कापड विणल्या जात होते. मात्र, काळानुरूप खादी विणाई बंद झाली. मात्र नाग विदर्भ चरखा संघाला आजही विणकरांची प्रतीक्षा आहे. रोजगाराची संधी असूनही आत्मनिर्भरतेकडे जाण्यास कोणी तयार होईल काय? असा चरखा संघास प्रश्‍न पडला आहे. येथील निंबोळी साबणाचे उत्पादनही कच्चामाल अभावी लॉकडाउनमुळे तुर्तास बंद पडले आहे. 


भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे स्थान अनन्यसाधारण आहे. 1942 च्या चले जाव चळवळीत येथील सत्याग्रहींनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. तसेच तुरुंगवासही भोगला आहे. महात्मा गांधींच्या विचारांनी आणि करेंगे या मरेंगे या मंत्रांनी स्वातंत्र्याचे वारे चांगलेच भिनत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा परीस पदस्पर्श मूलला दोनदा लाभला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. 1933 आणि 1936 रोजी महात्मा गांधी मूल येथून सावलीला गेले होते. ज्या मार्गाने गेले त्याच मार्गावर मूल येथे महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळयाचे अनावरण 24 डिसेंबर 1961 रोजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळेस अध्यक्षस्थानी राज्याचे तत्कालीन बांधकाममंत्री मा. सां. कन्नमवार हे होते. पुतळ्याच्या उभारणीसाठीची देणगी नामदेव सोमन्नाजी गोगीरवार यांनी आपले बंधु कै. सीतारामजी गोगीरवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली होती. 


हे वाचा— जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटदार भारी!

मूल आणि सावली परिसरात महात्मा गांधी यांचा विचार ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्याच्या काळात खादीला विशेष महत्व होते. स्वदेशीचा तो एक भाग होता. खेड्याकडे चला आणि ग्रामोद्योगाची उभारणी करून स्वयंरोजगार प्राप्त करा, हा गांधीजींचा विचार होता. म्हणून महात्मा गांधीनी स्वदेशी, खादीचा प्रचार प्रसार आणि हरीजन सेवा संघाच्या दौऱ्याच्यावेळी मूल आणि सावलीला भेट दिली. 1933 च्या काळात महात्मा गांधी यांनी वरघंटे यांची विहीर हरीजनासाठी खुली करून दिल्याचे सांगितले जाते. 1936 रोजी परत एकदा गांधीजी मूल येथून सावलीला गेले. त्यावेळेस त्यांनी एक आठवडा सावली येथे खादी केंद्रात मुक्काम केला होता. 
गांधीजींचा विचार अनेकांना प्रेरणादायी ठरला. स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्यात स्वातंत्र्य संग्राम सैनिक वसंतरावजी आपटे, गजानन गव्हाणकर, दत्तात्रय मुसली, निळकंठ माडेकर, जानकीरामजी दंडेवार या महान विभूतींनी स्वतःला झोकून दिले. 1942 च्या चले जाव चळवळीत जानकीराम दंडेवार यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. ब्रिटीशांचा लाठीमार खाल्ला पण त्यांनी इंग्रजांची माफी मागितली नाही. गजानन गव्हाणकर हे स्वतः दांडी यात्रेत सहभागी झाले होते. 

1958 मध्ये झाली स्थापना 
मूल येथे 1958 मध्ये खादी आयोग नियोजन विभागाचे सदस्य आणि म. गांधी यांचे अनुयायी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी उद्योगपती जमनालाल बजाज, बाबूराव सोहनी, केशवराव जांभूळकर, वसंतराव आपटे, का. शि. संतोषवार, शंकरराव वेले यांच्या उपस्थितीत नाग विदर्भ चरखा संघाची स्थापना केली. त्याचे कार्य मूल आणि सावली येथे अविरतपणे आजही सुरू आहे. मूलमध्ये आजच्या स्थितीला निंबोळी साबण आणि तिळाच्या तेलाचे उत्पादन घेतल्या जाते. जवळपास 25 घरांमध्ये आधुनिक चरख्यावर सुतकताई केल्या जाते. निंबोळी साबणाचे वार्षिक उत्पन्न आठ ते दहा लाख रुपये इतके आहे, तर तिळाच्या तेलाचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. सूतगुंडी दर महिन्याला 300 किलो नागपूर केंद्राला पाठविले जाते. नागपूर येथील मोमीनपुरा, कामठी या भागात कापड विणल्या जाते. सावली मध्ये चरख्यावर सूतकताई केल्या जाते. मूल आणि सावली या दोन्ही ठिकाणी खादी भांडार या केंद्रातून खादीच्या वस्त्रांची विक्री केल्या जाते. 

गाधीजींच्या मानसपूत्राचा सावली येथे विवाह 
काळानुरूप विणकर कमी झाल्याने आता या केंद्रामध्ये खादी विणल्या जात नाही. नाग विदर्भ चरखा संघाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. उत्कृष्ट विणकर कारागिरीचा पुरस्कारसुद्धा मूल केंद्राला मिळालेला आहे. 1936 मध्ये मूल खादी विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. उत्पादित खादी कापडाची रंगाई आणि धुलाई येथे होत होती. या खादी विद्यालयात अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, शंकरराव वेले, वंसतराव आपटे, गजानन गव्हाणकर हे स्वत: कार्यरत होते. गांधीजींच्या विचारांनी आणि त्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या सावली येथील खादी केंद्राला विनोबा भावे आणि त्यांचे वडील बाळकोबा भावे, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरोजीनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल या सारख्या दिग्गजांनी भेटी दिलेल्या आहेत. महात्मा गांधी यांचे मानसपूत्र कृष्णदास गांधी यांचा विवाह सोहळा सावली येथील खादी कार्यालय परिसरातील आंब्याच्या झाडाखाली अत्यंत साध्या पद्धधतीने पार पडला होता, हे विशेष! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com