खेकड्यांने उडविली अधिकाऱ्यांची झोप

file photo
file photo

अचलपूर (जि. अमरावती) ः रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्यामागे खेकड्यांचा दोष असल्याचा निष्कर्ष जलसंधारण मंत्री यांच्याकडून काढण्यात आला. त्यामुळे आपल्या तालुक्‍यातील धरणातील खेकडे पकडा अन्यथा आम्ही धरणातील हे खेकडे ताब्यात घेऊ, असा इशारा मनसेच्या येथील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
तिवरे येथील घटनेत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण बेपत्ता आहेत. अशातच खेकड्यामुळे धरण फुटण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. त्यात अचलपूर तालुका मागे नाही. आपल्या तालुक्‍यातही अशी घटना घडू नये यासाठी अचलपूर तालुक्‍यातील मनसेच्या वतीने पुढाकार घेतला असून जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला खेकडे पकडण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
अचलपूर तालुक्‍यात येत असलेल्या वझ्झर, चंद्रभागा, गोंडवाघोली, शहानूर या धरणांतील खेकडे सात दिवसांच्या आत पकडण्यात यावे व ते इतरत्र हलविण्यात यावे, अन्यथा मनसेच्या वतीने धरणांतील खेकडे पकडण्यात येईल व ते खेकडे पकडून प्रशासनाच्या हवाली करण्यात येतील. त्यादरम्यान कोणाच्याही आरोग्यास हानी पोचली, तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असा इशारासुद्धा देण्यात आला. त्यामुळे आता जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला असून त्यांची झोप उडाली आहे. हे अधिकारी स्वतः खेकडे पकडणार की मनसेच्या पदाधिकाऱ्यांना खेकडे पकडू देणार याकडे तालुक्‍यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

धरणात खेकडे असल्याचे व त्यामुळे धरणाला भीती निर्माण झाल्याचे आज कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले नाही. त्यामुळे खेकड्यांमुळे धरणाला कोणतीही भीती नाही. मात्र भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासनाच्या वेळोवेळी मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल.
- रूपेश मोहिते,
जलसंधारण अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com