अवकाळी पावसानं उडवली शेतकऱ्यांची झोप: भाजीपाला पिकासह कडधान्ययुक्त पिकांचं प्रचंड नुकसान

rain
rain

भंडारा ः शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भाजीपाला पिकासह कडधान्ययुक्त पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे.

मागील वर्षीचा खरीप हंगाम ऐन भरात असताना मावा, तुडतुड्याने पिकावर आक्रमण केले. त्यामुळे खरिपाचे अर्धेअधिक उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. खरिपाची ही तूट रब्बी हंगामात भरून काढण्याच्या बेतात शेतकरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात गहू, हरभरा, तूर, वाटाणा, लाख, लाखोरी, जवस आदी कडधान्ययुक्त पिकांची लागवड केली आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचीदेखील लागवड केली आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल घडून येऊन अवकाळी बरसात झाल्याने ही पिके धोक्‍यात आली आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, हवामान खात्याने 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. या संकेतानुसार मंगळवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह तुरळक पावसाला सुरुवात झाली. शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण आणि मध्येच आलेल्या पावसाने गारठा निर्माण झाला होता. भंडारा तालुक्‍यातील बहुतांश गावांत बुधवारी सकाळीदेखील पावसाची रिपरिप सुरू होती.

तुमसर तालुक्‍यातील सिहोरा, बपेरा परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, लाखोरी, जवस तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. गहू अक्षरशः खाली लोंबकळले आहे.निलज बु., करडी, मुंढरी, देव्हाडा बु. परिसरात मंगळवारी सायंकाळी हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.

शेतातील गहू, हरभरा, मका यासह इतर रब्बी पिके वादळवाऱ्याने जमीनदोस्त झाली. सातत्याने अवकाळी पावसाचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही हा मार सहन करावा लागला. पाऊस व वादळवाऱ्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. दरम्यान, शासन, प्रशासनाने सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

आंब्याचा मोहोर पडला गळून

वादळवाऱ्यासह जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहरात असलेल्या आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. साहजिकच उत्पादनात घट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com