शेतकऱ्यांनो, घाबरू नका; संत्र्याच्या गळतीवर कृषी विभागाने सूचविल्या काही उपाययोजना

Department of Agriculture measures for farmers
Department of Agriculture measures for farmers

कळमेश्वर (जि. नागपूर) : दीड महिन्यांपासून पावसाच्या संततधार बरसण्याने वातावरणात अनेक बदल झालेत. या बदलाचा परिणाम शेतीवर झाला आहे़. संत्रा पिकासह कपाशी, सोयाबीन व इतर भाजीपाला पिकांवर हा परिणाम झालेला दिसून येत आहे. या पावसामुळे हिरव्या संत्र्याला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी कार्बेंन्डाझीमच्या फवारणीसह कृषी विभागाने शेतकऱ्यांना इतर उपाययोजना सूचविल्या आहेत.

संततधार पावसामुळे अनेक बुरशीजन्य रोगाला संत्रा हे फळपीक बळी पडत आहे. लागून पडलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बागांवर फवारणीची संधीही मिळाली नाही़. त्यामुळे सद्यस्थितीत संत्राची फळगळ होताना दिसून येत आहे. संत्रा गळतीला अनेक कारणे असली तरी रस शोषण करणारा पंतग, सूक्ष्म अन्न द्रव्याची कमतरता आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत.

हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी झाडाखाली गळलेली फळे तातडीने उचलून बागेच्या बाहेर टाकणे किंवा ती पुरणे गरजेचे आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास त्याची वेळीच फवारणी घ्यावी, बागेला पाण्याची त्वरित व्यवस्था करणे गरजेचे आहे. ठिंबक असेल तर ठिंबकने पाणी द्यावे किंवा झाडाच्या दोन्ही बाजूला दोन दांड फाडून पाणी द्यावे.

काही बागेत हिरवी संत्राफळे गळत असून देठाजवळ तपकिरी चट्टा झालेला असेल तर कार्बेन्डाझीम २०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची तिव्रता जास्त वाटल्यास १० दिवसांनी याच औषधीची फवारणी करावी. संत्रा फळ पिकांमध्ये जर रस शोषण करणारा पंतग याया किडीमुळे फळ गळ होत असेल तर १ लिटर पाणी अधिक १०० ग्रॅम गुळ अधिक गळलेल्या फळांचा रस अधिक १० मिली़ मॅलाथीऑन याचे विषारी द्रावण तयार करून हेक्टरी १० ते १२ डब्बे झाडावर टांगावेत.

पंतग पकडण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, बागेत गुळवेल, वासनवेल उपटून नष्ट कराव्यात, अशा सूचना संत्राउत्पादक शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, काटोलच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

...तर प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल़
संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळमेश्वर व काटोल तालुका संत्राउत्पादक तालुका असल्याने या भागात संत्रा पिकांचे नुकसान झाले असून, उर्वरित संत्राफळावर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच झालेले नुकसान बघता आता आणखी नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी काही सूचना शेतकऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांची अंमलबजावणी केली तर प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
- जगदीश नेरलवार,
तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com