चंद्रपूर : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढलेल्या सोयाबीनची किंमत मातीमोल झाली. पऱ्हाटीच्या बोंडाची संख्या घटली तर धानाचे उभे पीक वाया गेले, अशा अनेक व्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या प्रतिनिधींपुढे सोमवारी (ता. 25) मांडल्या. तातडीच्या मदतीची मागणी केली.
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दौरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्याकरिता विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय पथकातील अधिकारी डॉ. आर. पी. सिंग, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रतिनिधी, कृषी शास्त्रज्ञ व अन्य वरिष्ठ उपस्थित होते.
यावेळी वरोरा तालुक्यातील बोरगाव देशपांडे या गावातील शेतकरी प्रमोद शंकर चिंचोलकर यांच्या शेतात झालेल्या सोयाबीनचा नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. झालेल्या पंचनाम्याबद्दल समाधानी आहेत काय? कोणत्या नोंदी झाल्यात, कोणी सर्वेक्षण व नोंदी केल्या. याबाबत शेतकरी, तलाठी, उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मजरा या गावाजवळील सालोरी, येनसा ब्लॉग येथील शेतकरी महादेव विठू डाहुले यांच्या नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी केली. भद्रावती तालुक्यातील टाकळी या गावातील विठ्ठल शिवराम मुसळे यांच्या शेतातील धान, कापूस, सोयाबीन या नुकसान झालेल्या पिकाचे निरीक्षण केले.
तसेच चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथील शरद तानाजी मोहुर्ले, प्रशांत मोहुर्ले या शेतकऱ्यांचे, शिवापूर बंदर येथील ऋषी नागोसे, गौतम पाटील तर वडाळा पैकू येथील संजय कुंभारे या शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसानसंदर्भातील समस्या केंद्रीय पथकाने समोर मांडल्या. सकाळी नागपूर येथील बैठक संपल्यानंतर 11 वाजता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा सुरू झाला. यावेळी नागपूर कृषी विभागाचे कृषी उपसंचालक रवींद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विनोद नागदेवते, तालुका कृषी अधिकारी प्रकाश व कृषी विभाग आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी पहिल्या हप्त्याचा 19 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्रशासनाला प्राप्त झाला. लवकरच जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार 30 शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई निर्गमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 86 हजार 30 शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा 19 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे. या नुकसान भरपाईमध्ये शेतकऱ्यांच्या जिरायत पिकांना प्रति हेक्टर 8 हजार रुपये भरपाई मिळणार आहे. फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना 18 हजार रुपये प्रति हेक्टर एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मदत 1000 रुपये पेक्षा कमी नसणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.