ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): काही दिवसांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यामुळे तालुक्यात महापूर आला होता. त्यावेळी तालुक्यातील ५१ गावे तब्बल तीन दिवस पाण्याखाली होती. त्यामुळे गावातील पाणी प्रदुषित झाले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नकार देत आहेत, तर काहींनी रुग्णालये बंद ठेवले आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी नगरपरिषदेचे गटनेते तसेच बांधकाम सभापती विलास विखार यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर इतरही आजारांनी डोके वर काढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील काही खासगी डॉक्टर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतानासुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार देत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत. तर, काही डॉक्टरांनी आपली रुग्णालये अशा गंभीर परिस्थितीत बंद ठेवली आहेत. याबाबतच्या रुग्णांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीच्या या परिस्थितीत डॉक्टरांनी मानवीय दृष्टिकोन समोर ठेवून आपली रुग्णालये बंद ठेवू नये. तसेच कोरोनाची लक्षणे नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करावा, असे आवाहन विखार यांनी केले आहे.
संपादन - भाग्यश्री राऊत
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.