मेळघाटात डॉक्‍टरांचा ढेपाळला कारभार

file photo
file photo

अचलपूर (अमरावती) : मेळघाटातील आदिवासी बांधवांसह सामान्य नागरिकांनाही योग्य उपचार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी मेळघाटातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची गंभीर स्थिती आहे. उलट आरोग्यवर्धिनी डॉक्‍टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत आहे. सोबतच वरिष्ठांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत, केवळ कागदोपत्री योजना राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

मनमानी कारभारामुळे व्हेंटिलेटर

पंतप्रधानांनी राबविलेल्या योजनांपैकी महत्त्वाकांक्षी असलेली आयुष्यमान भारत योजना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एनएचएम अंतर्गत राबविण्यात येत आहे. मात्र सध्या ही योजना डॉक्‍टरांच्या सततच्या गैहजरीमुळे व मनमानी कारभारामुळे व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे. आयुष्यमान भारत योजना सध्या मेळघाटातील चिखलदरा, धारणी या दोन तालुक्‍यांत एक एप्रिलपासून राबविण्यात येत आहे. परंतु आरोग्यवर्धिनी डॉक्‍टरांच्या गैरहजेरीमुळे या योजनेचा सध्या बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.

डॉक्‍टर दोन महिन्यांवर गैरहजर

या योजनेत नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्‍टरांपैकी सध्या 49 डॉक्‍टर कार्यरत आहेत तर 4 डॉक्‍टरांनी सेवेला रामराम ठोकला आहे. यातील बहुतांश डॉक्‍टरांनी योजनेच्या सुरुवातीपासूनच रंग दाखवण्यास सुरुवात केली असून ती अद्यापही कायम आहे. रुजू झालेल्या डॉक्‍टरांपैकी बहुतांश डॉक्‍टर सही केली की घरचा रस्ता धरताना दिसून येत आहेत, तर काही डॉक्‍टर ड्युटीवरच येत नसल्याची माहिती पुढे आली आहे. सलोना आरोग्यकेंद्रातील आमझरी येथील डॉक्‍टर दोन महिन्यांवर गैरहजर होते. विशेष बाब म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत होता, तरीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला सेवेत रुजू करून घेतले. असेच प्रकार अनेक उपकेंद्रात सुरू आहेत. या योजनेच्या डॉक्‍टरांकडे लक्ष दिले नाही तर ही योजना मेळघाटसाठी लाभदायक पेक्षा त्रासदायक जास्त ठरणार, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. 

आठ महिन्यांतच स्थिती गंभीर

या योजनेला जेमतेम आठवा महिना सुरू आहे. मात्र इतक्‍या कमी दिवसांतच या योजनेची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे दिसून येत आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्‍यांच्या उपकेंद्रातील बहुतांश डॉक्‍टर सतत गैरहजर आढळून आले. यावरून लक्षात येते की सदर योजनेतील डॉक्‍टरांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्यवर्धिनी योजना खरोखरच मेळघाटसाठी नवसंजीवनी ठरणार की फक्त कागदावरच ही योजना राबविण्यात येईल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.


सीएचओ डॉक्‍टरांच्या कामचे मूल्यमापन दर महिन्याला होणार असून त्यांना ठरवून दिलेल्या जॉबचार्टनुसार काम करावेच लागणार आहे. त्यांनी जर कामात हयगय केली तर त्यांच्यावर कार्यवाही निश्‍चित होईल. विशेष म्हणजे निश्‍चित मानधनाव्यतिरिक्त इतर मानधनाचा लाभ कामावरच मिळणार आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना काम केल्याशिवाय पर्याय नाही.
-अशोक कोठारी, एनएचएम अधिकारी अमरावती.

आरोग्यवर्धिनी योजना सुरू झाल्यापासून डॉक्‍टरांच्या कारभारामुळे ही योजना चर्चेत आहे. ही योजना गोरगरीब तसेच आदिवासी जनतेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. मात्र डॉक्‍टरांच्या गैरहजेरीमुळे या योजनेचा लाभ होतांना दिसून येत नाही. याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा मनसेला लक्ष देण्यास वेळ लागणार नाही. 
-प्रीतेश अवघड,जिल्हा उपाध्यक्ष मनसे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com