
भारतात लसीकरण खरतर इतर देशांच्या तुलनेत लवकर मिळत आहे. याचा लाभ सर्व लोकांनी संसर्ग थांबविण्यासाठी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना सध्या लसीकरणाच्या पहिल्या टप्यात कोविड लस टोचली जात आहे. आज डॉ. बंग कुटुंबीयांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला हजेरी लावली.
गडचिरोली : भारतात कोविडची साथ चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे. त्यामुळे आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल, असे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
ते आज डॉ. राणी बंग यांच्यासोबत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लसीकरणासाठी आले होते. यावेळी त्यांनी सर्व सामान्यांप्रमाणे आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत रांगेत राहून लसीकरण घेतले. यावेळी डॉ. बंग यांनी जिलह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांना जस जसा आपला नंबर येईल तस तसी लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले. लसीकरणावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.
डॉ. राणी बंग यांनी लस टोचल्यानंतर इतरांना लस घेण्याबाबत आवाहन केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या असून कोविड लसीकरणाबाबत आमचा चांगला अनुभव आहे. कोणीही लसीबाबत गैरसमज करून घेऊ नये. या ठिकाणी सर्व कर्मचारी अनुभवी आहेत. कोणीही लसीकरणाला घाबरू नये, असेही त्या म्हणाल्या.
भारतात लसीकरण खरतर इतर देशांच्या तुलनेत लवकर मिळत आहे. याचा लाभ सर्व लोकांनी संसर्ग थांबविण्यासाठी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना सध्या लसीकरणाच्या पहिल्या टप्यात कोविड लस टोचली जात आहे. आज डॉ. बंग कुटुंबीयांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला हजेरी लावली. जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविडविषयी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या लस टोचली जात आहे.
संपादन - नीलेश डाखोरे