नागपूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर जसा होत आहे, त्यापेक्षाही अधिक नकारात्मक वापर होत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे खाते वैध करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांचे खाते "आधार'शी जोडण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलाचे स्वागत करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे यातून सायबर गुन्हेगारीसह इतर गुन्ह्याच्याही मुळाशी जाणे शक्य होणार असल्याने गुन्हेगारांवरही नियंत्रण शक्य होणार असून विस्कटलेली सामाजिक घडीही नीट बसविण्यास मदत होणार आहे.
देशांत बहुतांश नागरिक आता सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटसऍप प्रत्येकाच्याच अंगवळणी पडले आहे. यात तरुणाईचा जसा समावेश आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असून विचार, सामाजिक व भावनिक संवेदनांचे आदान-प्रदान होत आहे. मात्र, यातून अनेक जण "फेक अकाउंट'च्या माध्यमातून फेक न्यूज, अफवा पसरविणे, एखाद्याची बदनामी करणे, राष्ट्रविरोधी पोस्ट टाकणे, दहशतवादाला समर्थन देण्यासाठीही सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याकडे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे समाजविघातक पोस्ट टाकणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे. परिणामी सामाजिक वातावरणही नकारात्मकतेने ढवळून निघत आहे. एवढेच नव्हे सायबर गुन्हेगारीतही गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. समाजाची घडी नीट ठेवण्यासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, पारिवारिक वातावरण योग्य ठेवण्यासाठी आता सोशल मीडिया वापरकर्त्यांवर नियंत्रण आवश्यक झाले आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून सरकारने सोशल मीडिया खाते "आधार'शी जोडण्यासाठी उचललेली पावले योग्यच असल्याचेही पारसे यांनी सांगितले. यासंबंधात विधीतज्ज्ञ व भाजपनेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिकाही दाखल केली आहे. उपाध्याय यांच्या मतानुसार सध्या देशात 3.5 कोटी टिट्वर अकाउंट आहेत, 32.5 कोटी फेसबुक अकाउंट आहेत. पण, सर्वांत धक्कादायक म्हणजे यातील जवळपास 10 टक्के अकाउंट्स फेक आहेत, असेही त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. |
|