अल्प उत्पादनामुळे शेतकरी हवालदिल; कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता

Farmers Anxiety about how to repay the loan
Farmers Anxiety about how to repay the loan

समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यात खरीप हंगामातील विविध पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने कर्जाचा परतफेड कशी करावी, प्रपंच कसा चालवावा या प्रश्नांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

निसर्गाचा प्रकोप आणि किडीपासून पिकाचे संरक्षण करण्याच्या नादात उत्पादन खर्चात वाढ झाली. निसर्गाने हिरावल्यावर किमान उत्पादन खर्च हाती येईल, अशी आशा बाळगलेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर बोंडअळीने हल्ला केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या व शेतकरी संकटात सापडला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उत्पादनात सातत्याने घट होत आहे. शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जात मात्र वाढ झाली आहे.

यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाला मात्र उत्पन्न झाले नसल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. यंदा शासनाकडून कापसाला साडेपाच हजार रुपयांच्यावर हमीभाव देण्यात आला. कापूस खरेदीच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून कापसाला 5 हजार 600 ते 5 हजार 800 हजार रुपये भाव दिला जात होता, परंतु शेतात कापूसच नसल्याने काही दिवसांतच कापसाची आवक थांबली. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस वेळेवर न आल्याने कापूस लागवडीला उशीर झाला. कापसाच्या झाडाला फळधारने वेळी पाणी न मिळाल्याने झाडांची वाढ खुंटली व काही झाडे सुकून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस लागवडीचा फटका सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात ढगाळी वातावरणामुळे रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाची फुलगळ झाली. यात सोयाबीन पीक करपले. 

काही शेतकऱ्यांनी महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी केली. मात्र, ते सुद्धा निष्फळ ठरले. सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा गळाल्या. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवले तर काहींनी सवंगणी केली. मात्र, उत्पादन खर्च तर सोडा कापणीचा खर्चही मिळाला नाही. लाखो रुपयांचा खर्च करूनसुद्धा पिके हातात येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रब्बीवर अवकाळी पावसाचा घाला

दुष्काळाच्या वास्तव्याची प्रशासनाने दखल घेऊन पैसेवारीची होत असलेली आकडेमोड शेवटी स्थिरावली आहे. प्रशासनाला पुर्नसर्वेक्षणासाठी आदेश देण्यात आल्यावर पैसेवारीत मात्र आकडेमोड करण्यात आली,  असे असले तरी अनियमित पाऊस, शेतीचा अवाढव्य खर्च, कर्जाची वेळेवर पूर्तता न होणे, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, सरकारला विकलेल्या मालाचा मोबदला वेळेवर न मिळणे, शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेल्या नगदी पैशातून व्यापाराकडून कटणी घेणे, यासारख्या अनेक कारणांमुळे शेतकरी मागे आला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने नेहमीच काणाडोळा करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. गत काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. रब्बी हंगामातही हीच वेळ येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com