Vidhan Sabha 2019 : प्रचारात घेतला जातोय शेतकऱ्यांचा मुद्दा

Vidhan Sabha 2019 : प्रचारात घेतला जातोय शेतकऱ्यांचा मुद्दा

अकोला : मताधिक्य मिळविण्यासाठी सर्वच नेते निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करून, शेती व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासन देतात आणि निवडणूक आटोपताच सर्व आश्वासने विसरतात. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अशीच शेती व शेतकरी, प्रचाराच्या केंद्रस्थानी असून, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आदी शेतकरी विषयांवर नेत्यांचे भाषणातून घामासान होत असल्याचे चित्र आहे.

दुष्काळासह अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण आणि व्यापाऱ्यांच्या लुटारू धोरण यामुळे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आर्थिक स्थिती बिकट झाली आणि पर्यायाने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेसुद्धा कठीण झाले. अशातच कर्जाच्या ओझ्यामुळे आणि आर्थिक कोंडीमुळे अनेकांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. असे असतानाही शेती व शेतकरी विकास साधण्यासाठी प्रयत्न करू, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, अशा अनेक घोषणा निवडणूक काळात करून शेतकऱ्यांचे मताधिक्य मिळविण्याचा प्रयत्न निवडणूक प्रचार सभांमध्ये कित्येक वर्षांपासून केला जातो आहे. सध्याही विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये तशीच स्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, शेतकरी राजा कुणाच्या झोळीत मते टाकतो हे लवकरच स्पष्ट होईल.

सत्ताधारी म्हणतात...

शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निधी, योजना उपलब्ध करून दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. सिंचन सुविधांसाठी सूक्ष्मसिंचन योजना, जलप्रकल्पांवर भर देऊन निधी, अनुदान दिले. शेतकऱ्यांना शाश्वत उत्त्पन्न मिळावे, यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या व अशा अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याचे भाषणांमध्ये सांगून, शेतकऱ्यांचे मताधिक्य उमेदवारांना मिळवून देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांचे स्टार प्रचारक करीत आहेत.

विरोधक म्हणतात...

अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सत्ताधाऱ्यांच्याच काळाच झाल्या. शेतमाल आयातकर, निर्यातकर, शेतमाल निर्यातबंदी, कृषी निविष्ठांची महागाई, बाजारपेठेत हस्तक्षेप करून शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. नोटबंदीमुळे, ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांची कोंडी केली गेली. हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी शासनाचे उदासीन धोरण असून, शेतकऱ्यांना योजना, अनुदानाचा लाभ मिळत नाही, हे व असे अनेक आरोप सत्ताधाऱ्यांवर करून विरोधी पक्ष प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे आश्वासने देऊन त्यांचे मताधिक्य मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सत्ताधारी असो की विरोधक, केवळ निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना आश्वासने देतात व नंतर त्यांना, शेतकऱ्यांचा त्यांच्या समस्यांचा विसर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये व चिकित्सक वृत्तीतून मतदान करावे.

- डॉ.प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज महाराष्ट्र

निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, सत्ता येतात त्यांचा विसर पडतो. उलट शेतकरीविरोधी धोरणे राबविली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता उघड व चिकित्सक दृष्टी ठेवून मतदान करावे.

- कृष्णा अंधारे, समन्वयक, शेतकरी जागर मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com