चारा, पाणीटंचाईमुळे पशुधन बाजारात

Cattle
Cattle

अमरावती - पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाइलाजाने पशुधन विक्रीस काढले आहे. विकल्या गेलेल्या एकूण पशुधनापैकी निम्मे धन कत्तलखान्यात पोहोचत आहे. चाऱ्याचे भाव शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असून भुकेने व्याकूळ जनावरे कुपोषित होऊ लागली आहेत. यामुळे दूध उत्पादन मात्र घटले आहे.

विभागातील पाचही जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याच्याही तक्रारी आहेत. या माध्यमातून मोजकेच पाणी नागरिकांना मिळत असून दुसरी फेरी येईस्तोवर पाणी पुरवावे लागते. मोठ्या जनावरांना ४० व लहान जनावरांना २० लिटर पाणी दररोज लागते. कुटुंबांतील इतर सदस्यांप्रमाणेच जनावरेही शेतकऱ्यांच्या कुटुंबांची सदस्य आहेत.

माणसालाच पुरेसे पाणी देता येत नसताना जनावरांना कोठून द्यायचे असा प्रश्‍न आवासून उभा ठाकला आहे. गावांतील विहिरी, बोअरवेल, तळे कोरडेठण्ण पडू लागली आहेत. पाण्यासोबतच चाऱ्याच्या समस्येने उग्र रूप  धारण केले आहे. हिरवा चारा नसल्याने सोयाबीन व तुरीचे कुटार या वाळल्या चाऱ्यावर जनावरांची भूक अवलंबली आहे. प्रथिनेयुक्त चारा पुरवणे शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. मोठ्या जनावरांना ६ तर लहान जनावरांना ३ किलो चारा दररोज लागतो. वाळला चारा जनावर फार खात नाहीत. त्यांची भूक भागत नाही. त्याचा परिणाम ते कुपोषित होण्यावर होऊ लागला असून दूध उत्पादन घटले आहे. दररोज सहा लिटर दूध देणारी म्हैस चारवर आली. गायींची सरासरी निम्म्यावर आली आहे. बकऱ्या व शेळींचे वजन घटू लागले आहे.

पाणी व चाऱ्याअभावी होत असलेले हाल बघवत नसल्याने पशुपालकांनी पशुधन विक्रीस काढण्याचा सपाटा लावला आहे. अमरावती बाजार समितीच्या बडनेरा येथील गुरांच्या बाजारात मे महीन्यात जनावरांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. चाळीस हजार रुपये किमतीचा बैल बारा-पंधरा हजारावर आला. तर गायींना चार ते पाच हजारांवर किमत दिल्या जात नाही. बकऱ्या व शेळींच्याही विक्रीचे दर लक्षणीय प्रमाणांत घसरले आहेत. विक्री झालेली निम्मी जनावरे कत्तलखान्याकडे वळविल्या जात आहे.

चारा छावणीचा प्रस्ताव नाही
गुरांच्या बाजारात जनावरांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असताना व त्यांची वाट कत्तलखान्याकडे वळली असताना विभागातील एकाही जिल्ह्यातून चारा छावणीचा प्रस्ताव नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्‍यातून एक प्रस्ताव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com