वनविभागाने कारवाई केली अन् अनेक कुटुंब रस्त्यावर आली, वनात केले होते अतिक्रमण

forest department action against encroachment in chandrapur
forest department action against encroachment in chandrapur

चंद्रपूर : बल्लारपूर बायपास मार्गावरील संरक्षित वनात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांवर वनविभागाने बुलडोझर चालविला. ही कारवाई शनिवारी (ता. 6) करण्यात आली. वनविभागाने अचानकपणे घरे पाडण्याची कारवाई केल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या कारवाईने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाने पूर्वसूचना दिली नसल्याचा तेथील नागरिकांचा आरोप आहे. तर, घरे बांधताना वनविभागाला पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे या अतिक्रमितांना घरे पाडण्याची पूर्वसूचना देण्याचा प्रश्‍नच उद्ध्वस्त नसल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर शहरालगतच्या बायपास मार्गाला लागून जंगल आहे. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात संरक्षित वनक्षेत्र म्हणून हा भाग ओळखला जातो. या संरक्षित वनक्षेत्रात काही नागरिकांनी अतिक्रमण करून जंगलतोड केली. त्यानंतर तेथील जमिनीवर घरे बांधून वास्तव्य सुरू केले. काहींनी, तर पक्की घरे बांधली आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक वनविभागाचे पथक प्रकाशनगरात पोहोचले. वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाणार असून, घरातील साहित्य बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, नागरिकांनी वनाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी अनेक घरांवर बुलडोझर चालविणे सुरू केले. यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याची नासधूस झाली. 

वनविभागाकडून अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. या प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक प्रदीप किरमे यांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांची समस्या ऐकून घेतली. वनविभागाच्या कारवाईने हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वनविभागाने घरे पाडण्याची कारवाई करताना नागरिकांना पूर्वसूचना दिली असती, तर घरातील साहित्याची नासधूस झाली नसती. वनविभागाने ही कारवाई तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- प्रदीप किरमे, नगरसेवक, चंद्रपूर

फर्निचरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. वनविभागाच्या या कारवाईने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. पूर्वसूचना दिली असती, तर अतिक्रमण हटविले असते. मात्र, या कारवाईत घरातील सर्व साहित्याची मोठी नासधूस झाली. 
- पीडित नागरिक, चंद्रपूर

मनपा, महावितरणला नोटीस देणार : कारेकर
वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली आहे. या अतिक्रमीत जागेवर घरे बांधणाऱ्यांकडून महानगरपालिका कर वसूल करीत आहे. तर, दुसरीकडे घरांना लागणारी वीज महावितरणकडून पुरविली जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीला नोटीस बजावणार असल्याचे चंद्रपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com