Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली सुपीक जमीन, पाण्याची मुबलकता, विविध खनिज व वन संपत्तीची उपलब्धता या सर्वांसोबतच राज्य व केंद्र शासनाकडून प्रत्येक उद्योगासाठी मिळणारी मदत यामुळे जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करून वाढविण्यासाठी पोषक वातावरण आहे.
या सर्वांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता व प्रामाणिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बुधवार (ता. १०) व्यक्त केले. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नियोजन भवन येथे आयोजित इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दैने मार्गदर्शन करत होते.
यावेळी उद्योग अधिकारी शिवनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश गायकवाड, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने पुढे म्हणाले की, उद्योग क्षेत्रात पुढे येऊ इच्छिणाऱ्या युवकांनी गडचिरोली हा मागास असल्याची भावना मनातून काढून टाकावी. हा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने श्रीमंत आहे. येथील आदिवासी शिक्षित आहे. येथे मध, मोहफुल, चारोळी, तेंदूपत्ता, बांबू, सागवान, औषधी वनस्पती आदी वनउपज तसेच लोह, ग्रेनाईट व इतर खनिज,
काजू, स्ट्रॉबेरी पिकविणारी सुपीक जमीन, बारमाही नद्यांमुळे विविध प्रक्रिया उद्योग व्यवसायात अमर्याद संधींची उपलब्धता आहे. उद्योग व्यवसायासाठी पुढे येणाऱ्यांच्या पाठीशी शासन मदत करायला नेहमीच तयार असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. यात विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोके यांनी आयात-निर्यात व्यवसाय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी यांनी कृषी उद्योगातील संधी, मैत्री संस्थेचे सागर ऑटी यांनी व्यवसाय सुविधा केंद्र,
पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई यांनी गडचिरोली पर्यटन क्षेत्रातील संधी, लॉईड मेटल्सचे संचालक विक्रम मेहता यांनी मोठ्या उद्योगामुळे जवळच्या परिसरात निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधी, आयडीबीआय बँकेचे विवेक निर्वानेश्वर यांनी लघु व मध्यम उद्योगाकरिता अर्थसहाय्य, धीरज कुमार यांनी डिजिटल कॉमर्स,
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अनिल जाधव आणि सुरेखा अहिरे यांनी उद्योग विमा, डाक विभागाचे विपणन अधिकारी पंकज कांबळी यांनी पोस्टाद्वारे मालवाहतूक या विषयावर माहिती दिली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजक तसेच नवउद्योजक सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.