विदर्भावर पुन्हा कोपला निसर्ग, अतिवृष्टीमुळे शेतपिकांची नासाडी: शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी

Heavy rain in wardha district again
Heavy rain in wardha district again

विजयगोपाल (जि. वर्धा) : परिसरात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतमालाची नासाडी झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कपाशीची बोंडे सडली. तर सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

गत आठवडाभरापासून सुरू असलेला पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. पंधरा दिवसांत कपाशी वेचणीस प्रारंभ होणार होता. शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येणार होती. चार पैसे त्यांच्या पदरी पडणार आहे, पण निसर्ग कोपला. गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे परिसरातील गावांना झोडपून काढले. 

कपाशीच्या पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. कपाशीला लागलेली फळे सडली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर यंदा सोयाबीनवर आलेल्या खोडकिडीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. अनेकांनी सोयाबीनच्या पिकात गुरे सोडली. लागवडखर्चसुद्धा निघणे कठीण आहे.

आधीच कोरोना विषाणूमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गाव गाठत शेतीचा व्यवसाय सुरू केला. पण निसर्गही साथ देत नसल्याने सारचे हतबल झाले आहे. यंदा सुरुवातीलपासूनच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पेरणीच्या वेळी सोयाबीन बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पेरलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यानंतर रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली. 

कृषी केंद्र चालकांनी चढ्यादराने खताची विक्री केली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यावर, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना खोडकिड आणि येलोमॅझक या रोगाने आक्रमण केले. तर आता गत आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने कपाशीच्या पिकाची बोंडे सडत आहे. शेतात पाणी साचले आहे. सोयाबीनच्या शेंगातून अंकुर निघू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे.

पिकांचे पंचनामे करा

अडेगाव, गिरोली, पिंपळगाव लुटे शिवारात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा लागवड खर्चदेखील निघणे कठीण आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून अंकुर बाहेर निघत आहे. तर कपाशीची बोंडे सडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पंचनामे करून आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी.
नितीन गायकवाड
ेशेतकरी, पिंपळगाव (लुटे) 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com