३२ तालुक्‍यांना वादळी पावसाचा फटका; अमरावती विभागात ३२ हजार हेक्‍टरमधील पिके उद्‌ध्वस्त

Heavy rains hit 32 talukas in Vidarbha
Heavy rains hit 32 talukas in Vidarbha

अमरावती : बुधवारपासून अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाने अमरावती विभागातील ३२ तालुक्‍यांतील ३२ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्यास बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वांत कमी नुकसान झाले आहे.

१७ ते २० मार्च या तीन दिवसांत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा या सर्व पाचही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसला. याचा फटका कापणीवर आलेल्या गव्हासह गंजी लावलेला चणा, मोहोरावरील आंबा, कांदा, लिंबू व संत्रा पिकांना बसला. शासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून प्राथमिक अहवाल तयार करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. पाचही जिल्ह्यांचा अहवाल आला असून त्यामध्ये विभागात ३२ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे म्हटले आहे.

रब्बी हंगामातील चणा पिकाची कापणी व मळणी जवळपास झाली असली तरी उशिराने पेरणी झालेल्या गव्हाला व काढणीवर आलेल्या कांद्याला अधिक फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील २२३ गावे बाधित झाली असून २ हजार ६२७ हेक्‍टर क्षेत्रातील गहू, १३६ हेक्‍टर क्षेत्रातील चणा, ४३४ हेक्‍टर क्षेत्रातील कांदा, ६२ हेक्‍टरमधील केळी, २२ हेक्‍टरमधील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

संत्रा उत्पादकांचा जिल्हा असलेल्या या जिल्ह्यातील अमरावती, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, मोर्शी, अचलपूर व चांदूरबजार या तालुक्‍यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्‍टर क्षेत्रातील संत्राफळांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा सात गावांना फटका बसला असून २४ कुटुंबे बाधित झाले आहे. वीज पडून एका व्यक्तीचा, तर चार जनावरांचा मृत्यू झाला. १९ घरांची अंशतः तर एका घराची पूर्णतः पडझड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभूळगाव व महागाव तालुक्‍यात पावसाने नुकसान झाले आहे. नेर तालुक्‍यातील गहू, ज्वारी, टरबूज, चणा, पपई, भाजीपाला, संत्रा, लिंबू, आंबा तर बाभूळगाव तालुक्‍यात पिंपळखुटा येथील शेवंताबाई मेश्राम या महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला. सोबतच पिकांचे नुकसान झाले. महागाव तालुक्‍यातही शेतीपिकांना फटका बसला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, मेहकर व सिंदखेडराजा या तालुक्‍यातील २२२ गावे बाधित झाली असून १० हजार ४१३ शेतकऱ्यांचे ७ हजार ३८० हेक्‍टर क्षेत्रातील कांदा, मका, गहू, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, पातूर या तालुक्‍यातील ४ हजार ७७० हेक्‍टर क्षेत्रातील गहू, कांदा, पपई, लिंबू, आंबा या पिकांना फटका बसला.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्‍टर)

जिल्हा तालुके क्षेत्र
अमरावती १० १४,९९४
अकोला ४,७७०
यवतमाळ १५३
बुलडाणा ७,३८०
वाशीम ४,८८० 
एकूण ३२ ३२,१७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com