मुलांसह मिळून पत्नीने केला पतीचा खून

आरोपीला ताब्यात घेताना कोतवाली पोलिस.
आरोपीला ताब्यात घेताना कोतवाली पोलिस.

नागपूर : पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा विटा-दगडाने ठेचून निर्घृण खून केला. हा थरार गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या झेंडा चौकात घडला. रवींद्र अडूळकर (53, रा. झेंडा चौक) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी रविना ऊर्फ उषा अडूळकर, मुलगा अक्षय (21) आणि अभिषेक (25, रा. शनी मंदिरजवळ, झेंडा चौक) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र अडुळकरला दारूचे व्यसन होते. त्याची झेंडा चौकात वडिलोपार्जित इमारत असून जवळपास 10 गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये भाडेकरू असून एका गाळ्यात मुलगा अभिषेक हा टॅटूचे दुकान चालवतो. तर रवीना ही गृहिणी आहे. रवींद्र हा खासगी काम करायचा. दरम्यान, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले. तो तिच्यावर पैसे उडवायला लागला. याची चाहूल लागताच रविनाने त्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले व पत्नीच्या तक्रारीवर 2015 मध्ये त्याच्याविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. गुरुवारी त्यांच्या कौटुंबिक खटल्याची न्यायालयात पेशी होती. या सुनावणीनंतर तो संध्याकाळी सहा वाजता महालातील घरी परतला. पत्नी रविनाशी वाद घालत होता. आईशी वाद घालत असल्याचे कळताच मुलाने वडिलांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. त्यानंतर पत्नी व दोन्ही मुलांनी मिळून काठी, दगड व विटाने त्याच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले.

हिंगण्यात थाटला होता संसार
पैसेवाला रवींद्र अडुळकर हा एका महिलेच्या प्रेमात पडला. तिच्यासाठी तो पत्नीचा छळ करीत होता. उलट पत्नीच्याच चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने त्या महिलेला हिंगण्यात भाड्याने घर घेऊन दिले होते. सर्व कमाई त्या महिलेवर तो उडवत होता. हा राग मनात धरून झेंडा चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा खून केला. यावेळी कुणीही मध्यस्थी करण्यास आले नाही.

घराच्या संपत्तीवरून भांडण
रवींद्र याचे वडिलापोर्जित घर व गाळे आहेत. काही भाडेकरू त्याच्याकडे भाडे देतात, तर काहीजण उषाकडे द्यायचे. रवींद्र हा सर्व भाडे आपल्याला मिळायला पाहिजे व घराचा काही भाग हवा म्हणून पत्नीशी भांडण करायचा. घर व दुकानांचा हिस्सा मागून तो तिला देणार होता, असा संशय होता. याच वादातून हत्याकांड घडल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com