अकोला : टीका करणारा प्रामाणिक असावा. सुपारी घेवून टीका करणाऱ्यांना यापुढे ठोकून काढणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यानंतर सैन्याच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत असलेल छायाचित्र प्रसिद्ध करण्यात यावे, या मागणीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी आघाडीचा निर्णय घेण्याबाबत एकीकडे चर्चेचा पर्याय खुला ठेवण्यात आल्याची भाषा वापरील जात असताना दुसरीकडे काँग्रेसची पिसे काढण्याचे प्रकारही सुरू आहेत. याबाबत विचारणा केली असता काँग्रेसकडूनच वंचितांची पिसे काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आरएसएसशी लढण्यास तयार नाही.
गांधीजींच्या विचारसरणीची काँग्रेस आम्हाला हवी आहे. सध्या काँग्रेस हिंदूत्ववादाचा पुरस्कार करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. वंचित बहूजन आघाडीवर टीका करणाऱ्यांना अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात असल्याबाबत विचारले असता त्यांनी ठोकशाहीचा पुरस्कार केला. टीका करणारा हा प्रामाणिक असावा, सुपारी घेवून टीका करणाऱ्यांना ठोकून काढण्यास मी सांगितले असल्याचे ते म्हणाले. माझा लढा समोरच्या हुकूमशाहसोबत आहे. त्यामुळे काहीबाबतीत मीसुद्धा हुकूमशाह असल्याचे सांगून त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या ठोकशाहीचा पुरस्कार केला. या पत्रकार परिषदेला आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आदींची उपस्थिती होती.
22 सोडून पुढे चर्चा -
काँग्रेससोबत महाआघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा करताना आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या 22 जागासोडून उर्वरित जागांसाठीच चर्चा होईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून माझ्या पत्राचे उत्तर मिळाले नसल्याचे सांगून त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी बोलावणे आले नसल्याचे स्पष्ट केले.
विरोधक आहोत, शत्रू नाही! -
राजकारणात सध्या संवाद हरविला आहे. जुन्या नेत्यांमध्ये असलेला संपर्क तुटला आहे. याबाबत खुद्द लालकृष्ण अडवाणी यांनी सभागृहात खंत व्यक्त केली होती. माझेही त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. नवीन नेत्यांनी तो संवाद कायम ठेवला नाही. त्यात राहुल गांधी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही येतात. आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही हे ते विसरून जात आहे. अलिकडे लोकशाहीमध्ये नवीन प्रथा पाडण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांना वागणूक दिली जात असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.